Thursday, February 18, 2010

ज्युरॅसिक पार्क ते क्वाटर्नरी पार्क

"जरा थांबा, तुम्ही शाकाहारी म्हणवता आणि जे वांग्याचे भरीत खात आहात त्यात एका सजीवाचा जीव जाणिवपुर्वक मिसळला आहे" असे जर कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला काय वाटेल?
होय असेच काहिसे होऊ घातले आहे सध्याच्या काही दिवसांपासुन. आता तुम्ही म्हणाल हे कोडयातले बोलणे सोडा'. खरे असे आहे कि, हा कोडयात पाडण्यासारखाच मुद्दा आहे आणि तो 'उचलली जीभ आणि लावली टाळाला'  असे म्हणुन टाळता येणारासुद्धा नाही.
मागील बरेच दिवसांपासून पेपरामध्ये 'बीटी' वांग्यांबर बंदी घालण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनाच्या बातम्या झळकत आहेत. आपले पर्यावरण मंत्री श्री. जयराम रमेश (IIT-MIT alumnus) त्यामुळे पेचात पडले आहेत.  परंतु हे बीटी वांगे आहे काय आणि त्यालाच एवढा विरोध का यासाठी थोडी वैज्ञानिक पार्श्वभुमी तयार करुयात.

कुठल्याही सजीवाच्या निर्मितीचा मुळ आराख़डा(Blue-Prints) हे त्याच्या DNA मध्ये असतो. असे DNA वेगळेकरून त्यापासून सजींवांची निर्मिती करण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले आहेत. या शास्त्राला जनुकशास्त्र(Genetics) असे नामकरणसुद्धा आहे. बीटी-वांगे हे आहे एक Genetically Modified (GM or Transgenic) वांग्याचे वाण (Seed). बीटी-कृमी (Bacillus Thuringiensis Worm) हा एक शेत-मातीत आढळणारा कृमी आहे. त्यात शेत-पिकाचे किडीपासून संरक्षण करणारा जनुक(Genes) असतो. नेमका हाच जनुक वेगळाकरुन तो मुळ वांग्याच्या वाणात(Seed) मिसळून बीटी-वांग्याचे (सुधारीत?) वाण तयार केले आहे एका परदेशी कंपनीने आणि ते एका भारतीय कंपनीमार्फत भारतात विकावयास आणले आहे. परदेशी कंपनीचा दावा आहे कि, किडे-अळी असे पिकांना उपद्रवी जीव जेंव्हा बीटी-जनुका जवळ जातात तेंव्हा हे जनुक एक विषारी द्रव बाहेर सोडते त्यामुळे किडे-अळी असे जीव पिकांजवळ येत नाहीत आणि पिकांचे आपोआप संरक्षण होते. याउलट काही तज्ञ्यांचा दावा आहे कि, बीटी-जनुकाचा अंश खाणाऱ्याच्या शरीरात गेल्यामुळे त्याच्या शरीरावर प्रतिकुल परिणाम जसे वंधत्व (Infertility), ऍलर्जी, कर्करोग(Cancer) होऊ शकतात.
दावे-प्रतिदावे काहीही असोत पण इथे एक नैतिक(Ethical) प्रश्न असा उठतो कि, 'निसर्गाने निर्मिती केलेल्या अशा वाणात बदल करून आपल्याला पाहिजे ते वाण तयार करण्याचा मानवाला अधिकार आहे काय?'  उदया मानसाच्या जनुकात, प्राण्यांचे जनुक मिसळून तुम्ही एक वेगळीच जमात(Breed) तयार कराल आणि काय माहित पुढे तीच जमात मानसाच्या अस्तित्वावर घाला आणेल? प्रश्न काल्पनिक असला तरीही शक्यतांपासून दुर नाही.

वाघ आणि सिंहाच्या संकरातून (Cross-Breeding) तयार केलेल्या LIGER (Lion + Tiger) चे चित्र खाली पहा.


आता याला काही आधार मिळतो का ते पाहु.  1993 साली 'स्टीवन स्पिलबर्ग' या द्रष्टया दिग्दर्शकाने 'ज्युरॅसिक पार्क' हा अफलातून चित्रपट आणला. त्याचे कथानक थोडक्यात असे आहे कि, जॉन हॅमंड हे 650 लाख वर्षांपुर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेल्या 'डायनॉसॉर' या भयानक प्राण्यांचे DNA मिळवतात.
सापडलेल्या DNA मध्ये बेडकाचे DNA मिसळून आणि जनुकशास्त्र(Genetics) वापरून डायनॉसॉर बनवले जातात. हे डायनॉसॉर ते एका पार्कमध्ये ठेवतात तेच हे 'ज्युरॅसिक पार्क'.हा पार्क त्यांना जगातील सर्वांना बघायला खुला करायचा असतो. या पार्कची शहनिशा करून त्यावर शिक्कामोर्तब(Endorsement) करण्यासाठी ते 3-शास्त्रज्ञ (1-गणितज्ञ, 2-जीवशास्त्रज्ञ) आणि 1-विमातज्ञ्याला पाचारण करतात

पार्कमधील डायनॉसॉरांची संख्या हि गुणसुत्रे (chromosomes) नियंत्रित करून मर्यादित ठेवलेली असते यात पार्कमध्ये फक्त स्रिलींगी (female) डायनॉसॉर असतील याची काळजी घेतली जाते. पार्कला भेट देणाऱ्यांपैकी एक 'डॉ. माल्कम' शंका उपस्थित करतात कि,"उत्क्रांतीवादाने आपल्याला हे शिकवले आहे कि जीवण कधीही बंदिस्त राहू शकत नाही. ते आपला मार्ग सापडून राहते ('Life finds a way')". घडतेही अगदी तसेच. बेडकाचे DNA (amphibian DNA) आपले गुणधर्म बदलतात आणि डायनॉसॉरांचे प्रजनन (breeding) व्हायला लागते. याची कल्पना ज्युरॅसिक पार्क मधील कुनाही शास्त्रज्ञ्याला अगोदर आलेली नसते.


शास्त्रज्ञांच्या पार्क भेटी दरम्यान, पार्कचा विद्युतपुरवठा एक फुटीर-माणुस खंडीत करतो आणि हे 'डायनॉसॉर' मोकळे होउन पार्कमध्ये फिरायला आलेल्या शास्त्रज्ञांच्या मागे लागतात. शास्त्रज्ञ आणि लहान मुले कसाबसा आपला जीव वाचवतात आणि अर्थातच पार्क चालू करू नये या मतापर्यंत शास्त्रज्ञ आणि प्रेक्षक सगळेच येतात ('स्टीवन स्पिलबर्ग'ची खरी कमाल यात आहे.) 

ज्युरॅसिक पार्क मधील विचार करायला लावणारी 4-दृश्ये खालील क्लिप मध्ये आहे. वाचकांना आवाहन कि ही क्लिप जरुर बघावी आणि त्यातील गणितज्ञ डॉ. माल्कम यांची वाक्ये काळजीपुर्वक ऐकावी. त्यांचं वाक्य 'Life finds a way' सगळ्यांवर कडी करून जाते.



कोणीही म्हणेल कि, ज्युरॅसिक पार्क हि एक वैज्ञानिक कल्पना (Science Fiction-SciFi) होती.  म्हणून काय प्रत्येक शोध, संशोधन, प्रकल्प यांकडे असे संशयाने पहायचे काय?
उदा. खालील दाखले हे मानवजातीसाठी उपकारकच ठरले आहेत.
१) लसीकरणामुळे(Immunization) देवी, कॉलरा अशा रोगांचे पृथ्वीतलावरून उच्चाटन झाले आहे.
२) अणु-औषधांमुळे (Nuclear Medicine) कर्करोगावर थोडेतरी नियंत्रण मिळवता आले आहे.
३) विज, फोन, विमान, इंटरनेट अशा शोधांमुळे मानवजात प्रगत (आणि सुखी?) झाली आहे.
४) मुळ पेशी (Stem-cells) मुळे कित्येक अवयव हे कृत्रीमरित्या तयार करता येणार आहेत.
पण कुठलेही शोध, संशोधन, प्रकल्प हे मानवजातीसाठी उपकारक असले तरीही ते निसर्गाशी सुसंगत आहे कि नाही हे प्रमाणित करणारी प्रयोगशाळा (Certifying Laboratory) अजूनतरी पुर्ण अस्तित्वात नाही नाहितर खालील प्रसंग आपणावर ओढावलेच नसते.
१) मुंबईच्या पुरात मिठी-नदी पुन्हा जिवंत झाली, सुनामी मुळे लाखो लोक मृत्यू पावले.
२) समुद्रातील पाण्याची पातळी वाढून काही वर्षांत 'मालदीव' सारखे छोटे देश बुडणार.
३) चीनमध्ये नदीवर बांधलेल्या धरणांमुळे कितीतरी प्रजाती(Species) नष्ट झाल्या आणि आजुबाजुच्या प्रदेशांतील तापमानात वाढ झाली आहे.
४) स्वाइन-फ्लू, बर्ड-फ्लू, चिकनबुनिया सारखे नवीन रोग येत आहेत.
जनुकशास्त्र हे निसर्गाशी सुसंगत कि विसंगत याचे उत्तर कदाचीत आपल्याला पुढची काही शतके मिळुही शकणार नसेल पण एक गोष्ट तितकीच खरी कि ते जर निसर्गाशी विसंगत असेल तर त्याची किंमत आपल्याला नामशेष झालेल्या डायनॉसॉर प्रमाणे चुकवावी लागेल आणि मग मानवानंतर पृथ्वीवर येणारा जीव मानवाला जिवंत करून त्याचे 'क्वाटर्नरी पार्क' ('The present period is called as 'Quaternary Period' according to Geological Timelines.)  बनवेल.


                         (क्वाटर्नरी पार्कचे कल्पनाचित्र)

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

Friday, February 12, 2010

माय नेम इज 'ब्रँड' ... युवर 'ट्रस्ट'

'चितळे बंधू मिठाईवाले आपले पुण्यातील दुकान बंद करण्याच्या विचारात'... काय, बातमी वाचून उडालात ना? मनात विचारांचे काहुर माजले ना? आता आम्हाला स्वादिष्ट बाकरवडी, आंबा बर्फी, मोदक इ. कोण देणार? पाहुण्यांना पुण्याहून नेतांना काय खाऊ न्यायचा? आपल्या परदेशी ग्राहकाला अस्सल पुणेरी पदार्थ काय खाऊ घालायचा? एक ना हजार प्रश्न. But the good news is ' असे काही होण्याची  काहीच शक्यता नाही'. पण समजा चितळेंनी तसा विचार जरी केला तरी लोक त्यांच्या घरावर मोर्चे नेतील, आंदोलन करायला रस्त्यावर उतरतील, सभा घेतील की, 'थोडे जास्ती पैसे घ्या, पाहिजे असल्यास आपल्या शिस्तीचा बाणा (रांग, टोकण, वेळेवर उघडुन-वेळेत बंद इ.इ.) अजून कडक करा (दुपारी वामकुक्षीसाठी बंद ठेवले तरी चालेल).... पण आमच्या जिभेचे चोचले पुरवा'. This is what a BRAND can do to you.


पण का हो असा 'ब्रँड' तयार करण्यासाठी व्यावसायिकाला जाहिराती(Advertisements),गाजा-वाजा(Publicity), सरकारी नियंत्रण(Permit), फुकट सँपलचे वाटप वगैरे वगैरे इत्यादींची मदत घ्यावी लागते का?
जरा इतिहासात डोकावून बघुयात...


१) भारताने मुक्त-आर्थिक धोरण अवलंबण्याच्या अगोदर(Pre-1991) बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये उद्योग उभारण्यासाठी किचकट सरकारी जाचातून जावे लागायचे (License Raj). यामुळे कोणी नवीन उद्योजक पुढे यायचा नाही. त्यामुळे त्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या एखाद्या कंपनीची मनमानी (Monopoly) चाले. उदा. Hindustan Motors या कंपनीने 1991 अगोदर 20 वर्षांत एकही नवीन चारचाकी Model बाजारात आणले नाही(सर्व जुने Ambassador ग्राहकांच्या माथी मारले). Bajaj Scooter नंबर लागल्यावर प्रत्यक्ष हाती यायला 5-6 वर्षे लागत. दुरध्वनीसंच (Telephone) मिळायलासुद्धा असेच 5-6 वर्षे लागत. पण यांना 'ब्रँड' म्हणता येइल? हि तर लादणुक झाली. म्हणजे असे सुद्धा लादलेले 'ब्रँड' असायचे तर...


२) 1991 मध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था थोडी नाविलाजाने का होइना खुली केली आणि भराभर परदेशी कंपन्या आपले दुकान भारतात मांडू लागल्या. भक्ष गिळलेल्या अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या भारतीय कंपन्यांना अचानक खडबडून जागे व्हावे लागले. काहींनी संघटीत होउन सरकारी संरक्षण मागितले (Bombay Club), काहींनी या आव्हानाला सामोरे जायचे ठरवले, काहींनी आपले धंदे बंद केले तर काहींनी आपला धंदा चक्क परदेशी कंपन्यांना विकला. पारले(Parle) ही शितपेयातली (Cold Drinks)नावाजलेली कंपनी. तिने आपले सर्व शितपेयातली ब्रँड (Thums-up, GoldSpot etc) कोका-कोला (Coca-Cola) या परदेशी कंपनीला विकले. Coke या आपल्या ब्रँडला स्पर्धा नको म्हणून कोका-कोलाने पारलेचे 'ब्रँड' मारायचे ठरवले पण Thums-up हा 'ब्रँड' ते काही मारू शकले नाही कारण त्याला असलेली लोकप्रियता! Its the only BRAND in the world which Coke couldnt kill after takeover. आहे कि नाही 'ब्रँड' ची गंमत?


३) बरेचसे 'ब्रँड' मर्यादित काळापर्यंत चालतात पुढे स्पर्धेमुळे त्यांचा टिकाव लागत नाही. अशांना संधीसाधू म्हणता येईल. उदा. DEC-Machines, Fiat etc.


४) वरिल उदाहरणे वस्तू (Products) संदर्भातील आहेत. आता तुम्ही म्हणाल सेवा (Services) क्षेत्रातील ब्रँडचे काय? सेवा क्षेत्रात प्रामुख्याने येणारे उद्योग म्हणजे हवाई-वाहतुक(Airlines) ,माहिती तंत्रज्ञान(IT-Services), पर्यटन(Tourism) वगैरे. सेवा क्षेत्रात सुद्धा ब्रँड असतो पण तो प्रामुख्याने जी व्यक्ती ती सेवा देते आणि जी व्यक्ती ती सेवा घेते या दोघांमधील अद्रुश्य बंधांवर अवलंबून असते. सेवा देणाऱ्याने सेवा दिली पण ती घेणाऱ्याला कशी वाटली यावरच त्याचे ब्रँड-मुल्य ठरते (How the rendered service is perceived, decides the Brand-Value). कसे ते सोदाहरण पाहु.
सिंगापुर एअरलाइन्स त्यांच्या उड्डानादरम्यान(In-Flight) दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल प्रसिद्ध आहे. एकदा सिंगापुर-मुंबई विमानप्रवासा दरम्यान बाजुला एक भारतीय जोडपे आपल्या तान्हुल्या बाळाला घेउन बसले होते. सिंगापुरहून प्रवास सुरू झाला आणि काही वेळाने ते छोटे बाळ रडायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या उपायांनीसुद्धा त्याचे रडणे काही थांबेना. आजुबाजुचे प्रवासी त्याकडे पाहू लागले. त्या जोडप्यालासुद्धा थोडे बुजल्यासारखे झाले. पण करणार काय? छोटे बाळच ते! त्या जोडप्याची ती अवस्था पाहून सिंगापुर एअरलाइन्सची एक तरुण हवाईसुंदरी जवळ आली आणि आपल्या जराशा तोकड्या आंग्ल भाषेत संवाद साधत बाळाला खेळवू का अशी परवानगी मागू लागली. आईने थोडे हायसे वाटून बाळाला हवाईसुंदरीजवळ दिले. ती बाळाला घेवून आपल्या कक्षाकडे गेली. काही वेळाने बाळ आणि हवाईसुंदरी अगदी हसत हसत आले आणि हवाईसुंदरीने बाळाला बरीचशी खेळनी आणली होती. मला खात्री आहे की ते जोडपे आणि बाकी इतर प्रवासीसुद्धा हवाईसुंदरीच्या या प्रेमळ व्यवहाराने सुखावले असणार आणि अगदी बाळाची सुद्धा अशी काळजी करणाऱ्या सिंगापुर एअरलाइन्सला पसंती देणार. झाले सिंगापुर एअरलाइन्सचे ब्रँडिंग झाले. You dont have to create BRAND, it gets created.



५) अमिताभ हा एक असाच ब्रँड (Yes, a person is also a BRAND). 'कुलीच्या' सेटवर झालेल्या अपघाताने म्रुत्युशय्येवर होता. पण लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या, नवस केले, होम-हवन केले आणि त्याला पुन्हा आपल्यात आणले.




आता मला एक सांगा, नामशेष झालेल्या किंवा बाजारातील पत कमी झालेल्या किती 'ब्रँड' नि लोकांचा विश्वास (खरोखरचा) संपादन केलेला असतो आणि तरिही त्यांना बाजारात पत राखायला अपयश आलेले असते?


जर बारकाइने बघितले तर नामशेष झालेल्या 'ब्रँड' नि लोकांचा पाहिजे तितका विश्वास कधीच संपादन केलेला नसतो. तो 'ब्रँड' केवळ एक संधी म्हणून चालत असतो (Opportunistic). जर लोकांचा पाहिजे तितका विश्वास त्यांनी संपादन केलेला असेल तर लोकच तो 'ब्रँड' मरू देणार नाहीत. फार लांब जायला नको 'चितळे', 'Thums-up','सिंगापुर एअरलाइन्स','अमिताभ' ही उदाहरणे बोलकी आहेत. यासाठी एक गुण मात्र त्या व्यावसायिकामध्ये असावा लागतो तो म्हणजे लोकांची 'नस' ओळखण्याचा, ती पकडून ठेवण्याचा, त्यांना त्यांच्या पैशाचा योग्य तो मोबदला आणि समाधान देण्याचा. मग तुम्हाला जाहिराती(Advertisements), सरकारी नियंत्रण(Permit), गाजा-वाजा(Publicity), फुकट सँपल यांच्या कुबड्या घ्याव्या लागत नाहीत.


मॅनेजमेंट-गुरू Stephen Covey हेच त्याच्या 'The SPEED of Trust' या पुस्तकात सांगतो.




एकदा का तुमच्या हाती लोकांची नस आली कि मग तुमच्या काळजाचे ठोके ते कधीच चुकू देणार नाहीत.

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)