Saturday, March 21, 2015

INTERSTELLAR समजुन घेतांना - भाग-३


वेळेला सापेक्ष बनवून आइन्स्टाइन आणि त्याच्या सापेक्षतावादाने भौतिकशास्त्राचा चेहराच बदलून दिला हे आपण मागील भागात (INTERSTELLAR समजुन घेतांना - भाग-२) पाहिले . खगोलशास्त्राततर त्याचे अढळ स्थान आहे. सापेक्षतावादाने (Relativity) एका नवीन संज्ञेला जन्म दिला ती म्हणजे काल-मंदत्व किंवा काल-विस्तार (Time Dilation).

काल-मंदत्वाचे उदाहरण सांगतांना जुळ्यांचे उदाहरण नेहमीच दिले जाते. कल्पना करा कि, दोन जुळी भावंडे आहेत, त्यापैकी एकाने अवकाशप्रवास करण्याचे ठरले आहे आणि तो पृथ्वीवरून प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणाऱ्या अवकाशयानातून अवकाशात जात आहे. जेंव्हा अवकाशप्रवास करून तो पुन्हा येइल तेंव्हा त्याला त्याचा पृथ्वीवरील भाउ जास्त वयाचा झालेला आढळेल. याला 'जुळ्यांचा विरोधाभास' (Twin Paradox) असेही म्ह्णतात.

          




जुळ्यांच्या उदाहरणात अवकाशात गेलेल्या भावाचे घड्याळ मंदावते आणि त्यामुळे तो पृथ्वीवरील भावापेक्षा तरुण राहतो.

काल-मंदत्व प्रामुख्याने दोन प्रकारात मोडते

१) वेगामुळे होणारे काल-मंदत्व (Velocity Time-Dilation)
या प्रकारात एखादी वेगात जाणारी वस्तु जसजशी प्रकाशाच्या वेगाच्या जवळ पोहोचते तसतसे तिचे घड्याळ मंदावते. जरा खालील उदाहरणे पाहुयात.

१.१) जागतीक अवकाश स्थानकाच्या (International Space Station) दिवसातून कितीतरी फेऱ्या पृथ्वीला होतात. त्यातील अवकाशवीर पृथ्वीवरील माणसाच्या तुलणेत सहा महिन्याच्या कालावधीत ०.००५ सेकंदाने तरुण असेल.



१.२) व्हॉयेजर-१ हे यान आता आपली सूर्यमाला ओलांडुन आंतरतारकिय (Interstellar) प्रवासाला लागले आहे. आपल्या सूर्याला सगळ्यात जवळ असणाऱ्या मित्र ताऱ्याजवळ (Alpha Proxima) जायला व्हॉयेजर-१ ला अजून ८०,००० वर्षे लागतील कारण कि ते ३५,५०० मैल प्रती-तास यावेगाने जात असून मित्र तारा हा सूर्यापासून ४.२५ प्रकाशवर्षे (Light Years) इतक्या अंतरावर आहे.  ८०००० वर्षानंतर व्हॉयेजर हे पृथ्वीवरील वस्तुपेक्षा एका तासाने तरुण असेल. 




१.३) पृथ्वीवर सातत्याने वेगवेगळ्या कणांचा मारा अवकाशातून होत असतो. बरेचसे कण वरचेवर पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणाच्या कवचामुळे जमीनीपर्यंत पोहोचत नाहीत. म्युऑन (Muon) असेच कण आहेत. या कणांना वस्तुमान जवळपास नसतेच व ते प्रकाशाच्या जवळपास पण प्रकाशाच्या वेगापेक्षा थोड्या कमी वेगाने प्रवास करतात तसेच त्यांचे अस्तीत्व हे अगदी थोड्या कालावधीचे असते त्यानंतर ते नामशेष होतात. शास्त्रज्ञांनी जेंव्हा या कणांचा अभ्यास केला तेंव्हा त्यांचा असा होरा होता की हे कण वातावरणाच्या बऱ्याचशा वरच्या भागातच नाहीसे व्हावयास हवे कारण त्यांचे अस्तित्व थोड्या काळासाठीच असते. पण त्यांना मात्र पृथ्वीच्या अगदी खालच्या भागातसुद्धा त्यांचे अस्तित्व जाणवले. याचे कारण म्हणजे हे कण जवळपास प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात त्यामुळे त्यांची वेळेची संदर्भचौकट (Frame of Reference) पृथ्वीवरील वेळेच्या संदर्भचौकटीपेक्षा वेगळी होते (ती मंदावते) आणि त्या वेळेच्या संदर्भचौकटीनुसार ती घटीका भरली की ते म्युऑन कण नामशेष होतात पण तो पर्यंत त्यांनी जमीनीच्या अगदी खालपर्यंत प्रवास केलेला असतो.

१.३) खालील कोष्टक वेग आणि त्याचा वेळेवर होणारा परिणाम स्पष्ट करण्यास मदत करते.

प्रकाशगतीच्या % वेगवेळेवर पडणारा फरक
10%0.995
20%0.980
30%0.900
40%0.908
50%0.893
60%0.800
70%0.714
80%0.600
90%0.436
99.9%0.045


२) गुरुत्वाकर्षणामुळे होणारे काल-मंदत्व (Gravitation Time-Dilation )
या प्रकारात एखादी वस्तु गुरुत्वाकर्षणाच्या स्रोत्राच्या जेवढ्या जवळ असते तेवढे तिचे घड्याळ मंद धावते. खालील उदाहरणे फारच चकीत करणारीआहेत

२.१) आपण जेंव्हा उभे असतो तेंव्हा आपले पाय हे आपल्या डोक्यापेक्षा कमी वृद्ध होत असतात.

२.२) एखादे आण्विक घड्याळजर (Atomic Watch) जमीनीखाली काही अंतरावर ठेवले आणि तसेच आण्विक घड्याळजर एखाद्या उंच ठिकाणी त्यांची वेळ बरोबर जुळवुन ठेवले तर काही वेळानंतर उंचीवरील घड्याळ हे जमीनीखाली ठेवलेल्या घड्याळापेक्षा जास्त वेळ दाखवेल.

२.३) प्रचंड उंचीवरून पडणाऱ्या (Free-Fall) माणसाच्या घड्याळावर काल-मंदत्वाचा परिणाम जाणवतो. तो जसा-जसा जमिनीकडे येउ लागतो तस तसे त्याच्या घड्याळावर परिणाम होतो. पण हा बदल एवढा सुक्ष्म असतो कि, आपल्याला त्याचा परिणाम जाणवू शकत नाही.

या काल-मंदत्वामुळे बरेच अनपेक्षीत परिणाम घडतात. उदा. एखादा अवकाशवीर प्रकाशाच्या वेगाने अवकाशात जात आहे आणि त्याच्या तेथील घड्याळ्यानुसार तो प्रत्येक तासाला त्याची खुशाली पृथ्वीवर कळवत असेल तर पृथ्वीवरील माणसाला तो अवकाशवीर काही सेकंदांनी खुशाली पाठवत असल्याचे जाणवेल कारण अवकाशवीराचे घड्याळ पृथ्वीवरील निरिक्षकाच्या संदर्भकक्षेनुसार (Frame of Reference) मंद धावत असेल. असाच गोंधळ व्हॉयेजर आणि पायोनियर या सूर्यमालेच्या किनाऱ्यावर असलेल्या अवकाशयानांच्या बाबतीतही घडतो पण वेग आणि गुरुत्वाकर्षणामुळे आलेले काल-मंदत्व एकमेकांचा प्रभाव कमी (Nullify) करतात त्यामुळे तो तितकासा जानवत नाही.

काल-मंदत्वाचा अजब चमत्कार म्हणजे कृष्णविवर (BlackHole) !!! एखादा ताऱ्याचे(Star) जेंव्हा इंधन (Helium) संपते तेंव्हा त्याचे वस्तुमान ठराविक असेल (Chandrashekhar Limit) तर त्या ताऱ्याचे कृष्णविवरात रुपांतर होते. हे कृष्णविवर म्हणजे प्रचंड वस्तुमान (Huge Mass) एखाद्या चेंडुएवढ्या गोष्टींत सामावलेले अजब स्थान बनते. त्याच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्याच्या सभोवतालच्या अवकाशावर प्रचंड गुरुत्वाकर्षण पडते आणि त्या अवकाशाला एकप्रकारची वक्रता (Curved) येते. या कृष्णविवराच्या किनाऱ्याच्या (Event Horizon) आत येणाऱ्या कोणत्याही वस्तुला स्वाहा करण्याची त्याची खासीयत असते (Hawking's radiation वगळता) एवढी कि प्रकाशकिरणही त्यातून बाहेर पडू शकत नाही त्यामुळेच आपण कृष्णविवर डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु त्याच्या अस्तीत्वाचे अनेक पुरावे मिळतात.




आपल्या आकाशगंगेच्या (MilkyWay Galaxy) केंद्रस्थानी एखादे कृष्णविवर असावे असा बऱ्याच खगोलतज्ञांचा दावा आहे. तर या कृष्णविवरात वेळ पुर्णपणे थांबलेला असतो. त्यातील गोष्टींना वय नसतेच. म्हणुणच कृष्णविवराला शुन्यवत/बिंदुवत अवस्थेचे (Singularity) एक प्रतिरुप (Model) म्हणून समजले जाते. कृष्णविवरातून आपल्याला विश्वाचा आरंभ आणि अंत एकाच वेळी पहायला मिळू शकतो असाही एक कल्पनाविलास आहे कारण वेळेचे अस्तीत्वच नसेल तर आरंभ काय आणि अंत काय सारखेच.
  
विश्वात असे काळाचे अजब चमत्कार चाललेले असतात पण काळाची अशी वेगवेगळी रुपे असलेली स्थाने कधी एकमेकांना जोडलेली असतील काय ? त्यास्थानांना मानवाला भेटी देता येतील काय? याचे उत्तर होय असेच आहे. पण याला मर्यादा आहेत विश्वातील अफाट अंतराच्या. आपल्या आकाशगंगेला सर्वात जवळची सर्पिलाकार दिर्घिका (Spiral Galaxy) 'देवयाणी' (Andromeda) हि आपल्यापासून लाख प्रकाशवर्षे (2 Million Light-Years) दुर आहे. आपल्या मानवजातीचा ज्ञात इतिहासच काही हजार वर्षांचा आहे तर या लाखो वर्ष दुर असलेल्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी जिवंत कोण असणार आणि तिथे जाण्यासाठी इंधन आणायचे कुठून ? आणि हे सर्व शक्यच नसेल तर जगनियंताने याचे निर्मिती केलीच कशासाठी ? एका हॉलिवुडपटात याला गंमतीने 'It would be a terrible waste of SPACE' असे म्हटले आहे. शास्त्रज्ञांचे असे मानने आहे कि, अफाट अंतरावर असणाऱ्या अशा स्थानांना जोडणारा खुष्किचा मार्ग अवकाशात जरुर कुठेतरी असेल याला त्यांनी कृमिविवर (WormHole) असे संबोधले आहे. त्यालाच 'Einstein-Rosen Bridge' असेही म्हणतात.



कल्पना करा कि, अवकाश हे एखाद्या रुमालासारखे आहे आणि त्याची तुम्ही घडी करत आहात. त्या घडीमुळे जास्त अंतरावर असलेले बिंदू एकमेकांच्या जवळ येतील तसाच काहीसा हा प्रकार आहे. कृमीविवराचे एक तोंड कृष्णविवरात (BlackHole) तर दुसरे श्वेतविवरात (WhiteHole)असले पाहिजे असे मानले जाते. कृष्णविवरात प्रत्येक गोष्ट स्वाहा केली जाते तर याउलट श्वेतविवरातुन प्रत्येक गोष्ट बाहेर फेकली जाते.


कोणी विचार करेल कि एवढे सगळे उपद्व्याप करून आपण जरी विश्वात कुठल्या दुरच्या ग्रहावर पोहोचलो तर तिथे आपल्या सारखेच किंवा आपल्याहून वेगळे जीव असतील काय ? यावर एक फारच चपखल-विनोदी इंग्रजी वाक्य आहे ते असे "The STRONGEST evidence that there exist INTELLIGENT species somewhere in the universe is that so far they have not contacted us".  :-)

असे हे काल-महात्म्य !!! कालाय तस्मैय नमः !!!  


(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)


Friday, January 02, 2015

INTERSTELLAR समजुन घेतांना - भाग-२

विश्वाच्या उत्पती संदर्भाशी निगडीत असलेल्या गोष्टींचा धावता आढावा आपण मागील भागात (INTERSTELLAR समजुन घेतांना - भाग-१) घेतला. न्यटनचे एक फारच महत्त्वपुर्ण वाकय इथे नमुद करावेसे वाटते. तो म्हणतो 'आपण आपल्या पुर्वजांच्या खांद्यावर बसून हे जग पाहत असतो' ('we stood on the shoulders of genious'). त्याच्या अगोदर कोपरनिकस, गॅलिलीओ अशा मातब्बरांचे ॠण तो येथे मान्य करतो.

न्युटनने गुरुत्वाकर्षणाचा (Gravity) शोध लावला आणि त्याचे गतिविषयक नियम (Laws of motion) हे भौतिकशास्त्रातील मैलाचा दगड (Mile Stone) बनले. पुढील जवळपास २०० वर्षे न्युटनच्या या नियमांनी भौतिकशास्त्रात अधिराज्य गाजवले. पण न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या मताच्या मर्यादा उघड करत त्या गुरुत्वाकर्षण शक्तीला वैश्विक रुप दिले ते द्रुष्टा शास्त्रज्ञ 'अल्बर्ट आइन्स्टाइन' याने आणि ते ही आपल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताद्वारे (Theory of Relativity).






                                    

यापुढील गोष्टींचा विस्तार करण्याअगोदर काही वैज्ञानिक बाबी आपण आधार म्हणून घेणार आहोत.

१) मॅक्स्वेल या शास्त्रज्ञाने प्रकाश हा निर्वात पोकळीत (Vacuum) c = ३x१०^८  या वेगाने प्रवास करतो असे सिद्ध केले. समजा प्रकाशाचा वेग एखाद्या मानसाने एका जागी स्थीर राहून मोजला आणि तोच वेग एखाद्या वेगवान रेल्वेगाडीत मोजला तर काय होइल ? शास्त्रज्ञांना असे आढळून आले कि, दोन्हीही वेळा किंवा अशा दोन वेगळ्या संदर्भ चौकटीत (Frame of Reference) प्रकाशाचा वेग सारखाच येतो तसेच भौतिकशास्त्राचे नियम कुठल्याही संदर्भ चौकटीत सारखेच लागू होतात. यालाच आइन्स्टाइनचा 'विशेष सापेक्षतावादाचा सिद्धांत' (Special theory of Relativity) असे म्हणतात.

२) आपण वावरत असलेल्या त्रिमित जगात (Three Dimensional world of Length, Width and Height ) प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने कुठलीच वस्तू जाउ शकत नाही (कदाचीत इतर प्रगत जमातींच्या विश्वात किंवा अनेक मितींची जाणिव असणाऱ्यांच्या जगात (In the world of Multi-Dimension) प्रकाशापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या गोष्टी असुही शकतील पण मनुष्याच्या त्रिमित जगात प्रकाशाचा वेग हा सर्वोत्तम ठरतो.).

३) आपल्या शक्तीदात्या सूर्यापासून प्रकाशाला आपल्या प्रुथ्वीपर्यंत येण्यासाठी साधारणतः ८-मिनिटांचा कालावधी लागतो.


आइन्स्टाइनचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत (General Theory of Relativity)

गुरुत्वाकर्षणाविषयी न्युटनने असे म्हटले आहे कि, या विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तुला एका बलाद्वारे आकर्षित करत असते. त्या बलाचे मुल्य हे त्या दोन वस्तुंच्या वस्तुमानाच्या समप्रमाणात तर त्यांच्या मधील अंतराच्या व्यस्त प्रमाणात असते. त्या बलाचे मुल्य खालील सुत्राने दाखवतात.

F = g(m1*m2/d*d)

m1= एका वस्तुचे वस्तुमान
m2= दुसऱ्या वस्तुचे वस्तुमान
g= गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक
d= दोन वस्तुंमधील अंतर

आइन्स्टाइनने असे म्हटले की, पृथ्वी व सूर्य हे गुरुत्वाकर्षण बलामुळे एकमेकांना धरून आहेत. (त्या बलाचे मुल्य वरिल सुत्रानुसार काढता येइल). पण समजा उद्या अचानक सुर्य त्याच्या स्थानापासून गायब झाला तर वरिल सुत्रात m1 ची किंमत शुन्य होउन न्युटनच्या मतानुसार सुर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम लगेचच पृथ्वीवर जानवून पृथ्वी अवकाशात कुठेतरी भरकटत जाइल.  पण वरिल बाबींत सिद्ध केल्यानुसार आपल्या त्रिमित जगात हा परिणाम जानवायला किमान ८-मिनिटांचा कालावधी तरी लागायला हवा कारण गुरुत्वाकर्षणाला वाहून नेणाऱ्या लहरी (Gravitational Waves) जरी प्रकाशाच्या वेगाने आपल्या पर्यंत पोहोचतील असे मानले तरी त्यांना किमान ८-मिनिटे लागतील कारण आपल्या जगात प्रकाशाचा वेग सर्वोत्तम आहे.

झालेतर इथेच आइन्स्टाइनने न्युटन पासून वेगळेपण घेतले.

आइन्स्टाइन असे म्हणणे मांडले कि, प्रचंड वस्तुमानाच्या (Mass) वस्तुमुळे त्या सभोवताली असलेल्या अवकाशाला (Space) एक प्रकारची वक्रता (Curve) येते. याचे सोपे उदाहरण म्हणजे एखाद्या मउ गादीवर जड लोखंडाचा एखादा गोळा ठेवल्यास तो त्या गादीचा काही पृष्ठभाग वक्र बनवेल. या वक्र भागाच्या किनाऱ्यावर जर एखादी गोटी ठेवली तर ती त्या वक्रमार्गावर चक्राकार घरंगळत जाईल. हेच उदाहरण आपल्या सूर्य आणि पृथ्वीबाबत लावता येइल. सूर्याच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्यासभोवताली जे अवकाश आहे ते वक्र बनले आहे आणि त्या वक्र अवकाशात पृथ्वी सापडली आहे. जरी पृथ्वी आपल्या मार्गात सरळ जात असली तरीही अवकाशच वक्र असल्यामुळे ती सूर्याभोवती फिरतांना दिसते. मग पृथ्वी सुर्यावर जाउन का आदळत नाही ? तर त्याचे कारण म्हणजे पृथ्वीचे स्वतःचे असलेले वस्तुमान आणि अवकाशात असलेला वक्रपणा !!!



कंकणाकृती सूर्यग्रहण (Solar Eclipse) आणि आइन्स्टाइनच्या सिद्धांताचा पडताळा
आइन्स्टाइनने त्याचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत १९१५ साली मांडला पण त्याचा प्रत्यक्ष पडताळा घ्यायला १९१९ साल उजाडावे लागले. शास्त्रज्ञांचे असे म्हणणे होते कि आइन्स्टाइनने सांगितल्या प्रमाणे जर प्रचंड वस्तुमानामुळे त्याच्या सभोवतालचे अवकाश वक्र बनत असेल तर सूर्याचे वस्तुमान प्रचंड आहे मग त्यासभोवतालचे अवकाशही वक्र झालेले असले पाहिजे. त्यामुळे एखाद्या दुरच्या ताऱ्यापासून निघालेले प्रकाशकिरण सूर्याजवळून जातांना वाकून गेले पाहिजेत. पण मग हे सगळे पडताळायचे कसे कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशात आपणास दुरच्या ताऱ्याचा प्रकाश कसा दिसणार ? यासाठी १९१९ सालचे कंकणाकृती सूर्यग्रहणाचा वापर करायचे ठरले. जर दुरच्या ताऱ्यापासुनचा प्रकाश वाकून पृथ्वीवर येणार असेल तर त्या ताऱ्याचे स्थान पृथ्वीवरील निरिक्षकाला विस्थापित (Displaced) झालेले दिसेल पण हे त्याचे 'आभासी स्थान' (Virtual) असेल कारण प्रकाश सरळ त्या निरिक्षकाच्या डोळ्यात जाणार असेल तर त्याला तो तारा सरळ रेषेतच दीसेल.



झालेही अगदी तसेच दुरच्या ताऱ्यापासून आलेली किरणे सूर्याजवळून जातांना वाकून गेली आणि आइन्स्टाइनचे मत 'गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमानामुळे त्या सभोवतालच्या अवकाशाला आलेली वक्रता आहे' हे सिद्ध झाले.

वेळेची सापेक्ष संकल्पना (Relative Nature of Time)
या वक्र अवकाशाचा परिणाम कालावर कसा होतो हे जरा क्लिष्ट प्रकरण आहे.आइन्स्टाइनच्या अगोदरपासून काल ही संकल्पना निरपेक्ष (absolute) मानली गेली. न्युटन त्याच्या 'The Mathematical Principles of Natural Philosophy' मध्ये म्हणतो कि, 'निरपेक्ष काल हा या विश्वात सगळीकडे सारखाच आहे. तो कुठेही सारख्याच गतीने जात असतो' (The 'absolute time' flows at the same rate throughout the Universe, independently of any influences).

वेळेची संकल्पना समजून घेण्यासाठी कल्पना करा कि दोन संदर्भचौकटी (Frame of Reference) आहेत एक कमी गुरुत्वाकर्षणाची आणि दुसरी जास्त गुरुत्वाकर्षणाची. दोन्ही संदर्भचौकटीत एक-एक निरिक्षक आहे.

कल्पना करा कि एक निरिक्षक जो अतीशय कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या संदर्भ चौकटीत बसला आहे त्याच्याकडे त्या संदर्भचौकटीत चालणारे घड्याळ आहे. त्याने प्रकाशकिरण 'a' स्थानापासून'b' स्थानाकडे पाठवला तर त्याला प्रकाशाने ३x१०^८ वेगाने ते अंतर किती वेळेत कापले हे त्याचे घड्याळ अचुक दाखवेल.



आता कल्पना करा कि दुसरा एक नीरिक्षक अतीशय जास्त गुरुत्वाकर्षण असलेल्या संदर्भ चौकटीत बसला आहे. a-b एवढेच अंतर असलेल्या c आणि d या दोन बिंदुंमध्ये त्याने प्रकाश पाठवला तर प्रकाशाने ३x१०^८ वेगाने ते अंतर किती वेळात कापले हे त्याचे घड्याळ अचुक दाखवेल.


वेग = अंतर /वेळ. (Velocity = Distance / Time )

दोन्हीही संदर्भ चौकटीत प्रकाशाचा वेग सारखाच येइल (मॅक्स्वेल ने हे दाखवून दिलेले आहे) तसेच दोन्हीही घड्याळ प्रकाशाला सारखाच वेळ लागला हे दाखवेल. पण आपण वरील परिच्छेदात पाहिले कि, गुरुत्वाकर्षणामुळे अवकाशाला वक्रता येते त्यामुळे c-d हे अंतर जरी a-b एवढे असले तरीही प्रकाशकिरणाने वक्र-मार्ग अवलंबल्यामुळे प्रकाशकिरणाने दुसऱ्या दाखल्यात जास्त अंतर कापलेले असेल पण तरीही तिथले घड्याळ पहिल्या दाखल्याइतकीच वेळ दाखवत असेल तर निश्चितच जास्त गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असलेले घड्याळ हे कमी गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असलेल्या घड्याळाच्या तुलनेत हळू धावत असले पाहिजे.

कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या संदर्भ चौकटीतील निरिक्षकाला जास्त गुरुत्वाकर्षण असलेल्या संदर्भ चौकटीतील निरिक्षकाचे घड्याळ हे हळू धावतांना दिसेल. म्हणजेच वेळ हि संदर्भ चौकटीशी निगडीत बाब झाली. दोन्हीही निरिक्षकांना आपण सारखाच वेळ घालवल्याचा भास होइल पण जर त्यांची तुलना करायला गेलात तर त्यांच्यामध्ये तफावत जाणवेल. म्हणजेच वेळ हि निरपेक्ष (Absolute) नसून ती मोजनारा कुठल्या संदर्भ कक्षेतून हे मोजमाप करत आहे त्यावर अवलंबून असते. म्हणजेच वेळ हि सापेक्ष (Relative) कल्पना झाली.

अशा प्रकारे वेळेला सापेक्ष बनवून (Time is relative) आइन्स्टाइनने भौतिकशास्त्रात प्रचंड उलथापालथ घालवून दिली. त्यांचा वेध आपण पुढील प्रकरणात घेउयात.

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)

Tuesday, December 09, 2014

INTERSTELLAR समजुन घेतांना - भाग-१

भारतीय पुराणात एक कथा आहे. पृथ्वीतलावर एक राजा राज्य करीत होता. राज्यात अगदी सगळे अलबेल चालले होते. हे पाहून राजाला देवांचा राजा 'इंद्राचे' भेटीचे आमंत्रण येते. राजा एका दिवसाच्या भेटीसाठी स्वर्गलोकात जातो. भेट संपवून परत पृथ्वीतलावर येतो आणि पाहतो कि, त्याची तिसरी पिढी राज्य करत आहे.

पुराणातली हि कथा 'Time Travel' विषयी बरेच काही सांगून जाते.

नुकताच 'INTERSTELLAR' नावाचा हॉलिवुडपट पडद्यावर आला. खरेतर चित्रपट हे मनोरंजनाचे साधन पण जर चित्रपट समजावून घेण्यासाठी जर कष्ट घ्यावे लागत असतील तर हे जरा अतीच झाले. एकदाच पाहुन न समजणारे चित्रपट तयार करण्यात हॉलिवुडवाल्यांचा कोणी हात धरू शकत नाही जसे-  Matrix (and its Sequel), Inception, Interstellar वगैरे. 





Interstellar आधुनिक भौतिकशास्त्र (Modern Physics), खगोलशास्त्र (Cosmology), अंतराळशास्त्र (Space Science) यांतील बऱ्याचशा गोष्टींना स्पर्श करते. जसे बिंदुवत अवस्था (Singularity), आंतरतारकिय प्रवास (Interstellar Travel) , कृष्णविवर (Black Hole), कृमीविवर (Worm Hole), कालमंदत्व/कालविस्तार (Time Dilation) आणि सापेक्षतावाद (Relativity), स्थल-कालाची वक्रता आणि गुरुत्वाकर्षण ( Curvature of Time-Space and Gravity), अनेक मिती (Multi-Dimension) वगैरे.

काही पायाभुत संकल्पना समजावून घेउन पुढील टप्प्यात जशी गरज भासेल तसा आपण त्याचा विस्तार करू.

विश्वाची उत्पती
या विश्वाच्या उत्पत्तीसंदर्भात अनेक सिद्धांत मांडण्यात आले. त्यांपैकी ज्यांना सर्वाधिक प्रसिद्धी आणि मान्यता मिळाली असे दोन सिद्धांत आहेत.

१) महास्फोटाचा सिद्धांत (Big-Bang Theory)
असे मानले जाते की या विश्वाची उत्पत्ती साधारणपणे १५-अब्ज वर्षांपुर्वी झाली. मग प्रश्न पडतो कि १५-अब्ज वर्षांपुर्वी काय अस्तीत्वात होते? याचे उत्तर आधुनिक विज्ञान असे देते कि 'काही नाही' (आठवा दुरदर्शनवरिल 'भारत एक खोज' मालिका आणि तिचे 'टायटल साँग' ... "स्रुष्टीसे पहले सत नही था असत भी नही ...."). त्यावेळी एका बिंदुवत स्थितीत (Singularity) प्रचंड प्रमाणात उर्जा सामावलेली होती, नेमका तीचा स्फोट होउन ती उर्जा इतस्ततः पसरू लागली आणि त्यातून आजच्या विश्वाचा जन्म झाला. आत्तापर्यंततरी याला सर्वाधीक वैज्ञानिकांचा आधार मिळाला आहे.


२) स्थिर अस्तित्वाचा सिद्धांत (Steady State theory)
जगात काही शास्त्रज्ञांचे असेही म्हणणे आहे की, या विश्वाला ना जन्म आहे ना म्रुत्यु. ते अनादी अनंत आहे. ते असेच होते आणि असेच राहिल फक्त ते काही स्थित्यंतरातून सारखे जात असेल. जसे आजच्या घडीला ते वाढते आहे (Universe is expanding) तर काही कोटी वर्षांनंतर त्याच्या आकुंचनाला (Contraction) सुरुवात होईल आणि मग ते बिंदुवत अवस्थेत पोहोचेल मग पुन्हा एकदा त्याचा स्फोट होऊन ते वाढायला लागेल आणि हे चक्र अव्याहतपणे चालुच आहे. फॉएल आणि नारळीकर हे या सिद्धांताचे समर्थक मानले जातात.


महास्फोट आणि स्थलकालाची निर्मिती
या विश्वातील वस्तु-न-वस्तू ही छोट्यातील छोटया कणांपासून बनली आहे हि संकल्पना सर्वप्रथम 'कणाद' या भारतीय विचारवंताने आणि पाश्चिमात्त जगात 'डाल्टन' यांनी मांडल्याचे बोलले जाते. त्यालाच आधुनिक विज्ञान 'अणु' (Atom) असे म्हणते. पुढे असे आढळले की हे अणुसुद्धा त्याहुनही आणखी छोट्या अशा कणांपासून बनलेले असतात त्यांनाच आपण प्रोटॉन, न्युट्रॉन आणि इलेक्ट्रॉन म्हणतो. हे तीनही कण अजूनही छोट्या अशा अतीसुक्ष्मकणांपासून (sub atomic particles or strings like Quark, Pleton, Messon, Barrion etc) बनलेले असतात. शास्त्रज्ञांना अजुनपावेतो मुख्य ११ प्रकारच्या अशा अतीसुक्ष्मकणांविषयी (strings)ज्ञान झालेले आहे.  या महास्फोटाचे प्रारण (Cosmic Background Radiation)अजुनही विश्वात इतस्तत: फिरत असुन ते शास्त्रज्ञांनी  सिद्ध केले आहे. अजुन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्फोटानंतर हे विश्व अतिशय जलद(Cosmic Inflation) गतीने वाढायला लागले तसेच ते थंडही होत गेले.




महास्फोट झाल्यावर लगेचच काही वस्तुंची निर्मिती झाली नाही. महास्फोटातून मुलकण बाहेर पडून ते इतस्ततः पसरू लागले. यांना अगोदर वस्तुमान (Mass) नव्हते. हे मुलकण देवकणांच्या (Gods Particle or Higgs Boson) क्षेत्रांतून (Higgs Field) जातांना त्यांना वस्तुमान प्राप्त झाले. जे कण देवकणांच्या प्रभाव क्षेत्रांपासून वाचले ते वस्तुमान रहीत राहिले. देवकणांचे अस्तित्व अंशतः सिद्ध करणारा प्रयोग काही वर्षांपुर्वी युरोपातल्या प्रयोगशाळेत (LHC) यशस्वी झाला.

अतीसुक्ष्मकणांपासून पुढे प्रोटॉन, न्युट्रॉन आणि इलेक्ट्रॉन तयार झाले आणि यांतुनच अणू (Atom) आणि मुलद्रव्यांची (Elements) निर्मिती झाली. याच मुलद्रव्यांपासून तारे, ग्रह, धुमकेतू अशा गोष्टींची निर्मीती झाली. काही मुलद्रव्ये तयार व्हायला ताऱ्यांच्या पिढ्या जायला लागल्या (उदा. कार्बन, सोने, लोखंड इ.). हे सर्व चालू असतांना विश्वाचे प्रसरण(Expansion) चालुच होते आणि अजुनही ते होतेच आहे.

काळाची निर्मीती केंव्हा झाली हा जरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. असे म्हटले जाते कि जेंव्हा हे विश्व बिंदुवत अवस्थेत (Singularity) होते तेंव्हा कांळ आणि स्थल यांचा विचारच होऊ शकत नाही, त्या अवस्थेत भौतिक्शास्त्राचे नियम चालुच शकत नाहीत. स्फोटानंतर स्थल-काळाला (Space and Time) लगेचच सुरुवात झाली असे म्हटले जाते.

बलांची (Forces) निर्मिती केंव्हा झाली हा पण एक महत्त्वपुर्ण मुद्दा आहेच. आत्तापर्यंत मानवाला ४ प्रमुख बलांची माहिती झालेली आहे.

१) क्षीण बल (Weak Nulclear Force)
२) सशक्त बल (Strong Nulclear Force)
३) विद्युतचुंबकीय (Electromagnetic Force)
४) गुरुत्वाकर्षण (Gravitational Force or Gravity)

मितींची (Dimensions)निर्मितीसुद्धा महास्फोटानंतर झाली. आपण लांबी, रुंदी, उंची यांच्या त्रिमित (Three Dimenion) जगात रहातो. अवकाशात वेळ या चौथ्या मितीचा विचार केला जातो. महास्फोटानंतर ११ मितींची (11 Dimensions)निर्मीती झाली ज्यांचा आपण आपल्या जगात विचारसुद्धा करु शकत नाही.

आपले विश्व हे विस्तारत आहे (expansion) आणि त्या विस्ताराचा वेग हा विश्वाच्या टोकाकडे(far end) जास्त आहे. विश्वाचा हा विस्तार हा गुरुत्व बलावरच होत असणार पण जर विश्वात असलेल्या दिर्घिका, तारे ,ग्रह यांच्या वस्तुमानाचा विचार केला तर त्यामुळे एवढा विस्तार होणार नाही असे शास्त्रज्ञांना वाटते. मग हा विस्तार कोण करत असणार तर ते म्हणजे कृष्णउर्जा (Dark-Energy) जी साध्या डोंळ्यांना दिसु शकत नाही आणि आपल्याला जे विश्व दिसते ते केवळ ४% आहे बाकी ९६% अजुन आपल्याला कळलेले नाही. या कृष्णउर्जेचा अजुनपावेतो खात्रिशिर पुरावा मिळालेला नाही.
पुंजभौतिकी (Quantum Mechanics) या भौतिकशास्राच्या शाखेत प्रामुख्याने अणु, त्याचे अंतरंग अशा सुक्ष्मातिसुक्ष्म गोष्टींचा विचार होतो तर ग्रह-तारे, त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण अशा गोष्टीं समजण्यासाठी आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा(Relativity) उपयोग केला जातो.

या कमालीच्या भिन्न वाटणाऱ्या गोष्टी एकत्रीत करून या विश्वनिर्मितीचा एकच सिद्धांत (Theory of Everything, Quantum Gravity) मांडला जाऊ शकतो का याचा शास्रज्ञांना ध्यास लागला आहे.

पायाभुत असणाऱ्या या गोष्टींचा ढोबळ, धावता आढावा आपण घेतला. पुढील प्रकरणात आपण अजून थोड्या महत्त्वपुर्ण गोष्टीं समजावून घेउ आणि त्याचा उपयोग INTERSTELLAR  समजून घेण्यासाठी होतो का ते पाहु.
(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)


सबसे छोटा रुपय्या - भाग-३

चालु खात्यातील तुट (Current Account Deficit) वाढल्याचे व्रुत्त अजुनही येतच आहेत.  २०१३ सालची तात्कालीन कारणे काय होती त्याचा आढावा आपण घेणार आहोत. पण थोड्याशा अवकाशानंतर !!!

Watch this space ...

Friday, September 20, 2013

सबसे छोटा रुपय्या - भाग-२

रिझर्व बँक - अर्थमंत्रालय - उद्योग - सरकार आणि देश यांची एकमेकांत असलेली विचित्र पण महत्त्वाची गुंफण आपण मागिल लेखात पाहिली (सबसे छोटा रुपय्या - भाग-१) आता जरा चलनामध्ये असलेला विनिमय-दर (Exchange Rate) कसा ठरवला जातो याची पार्श्वभुमी पाहुयात.

माणुस जेंव्हापासून समुहात राहू लागला तेंव्हापासून एखाद्या वस्तुच्या मोबदल्यात काही इतर वस्तू/सेवा देण्या-घेण्याचा व्यवहार (Barter-System) तो करत आला आहे. आता त्यांचे विनिमयाचे प्रमाण अर्थातच त्यावेळच्या असलेल्या गरजेला होते (उदा. शेत नांगरणीच्या कामाच्या बदल्यात दोन पोती धान्य वगैरे). त्यानंतर वेगवेगळ्या शासनकर्त्यांच्या काळात नाणी आली (उदा. - सम्राट अशोक, मौर्य, मराठा, मुघल वगैरे) आणि व्यवहार नाण्यांत केला जाउ लागला (तरीही कुठे-कुठे Barter-System होतीच).
 
 
(Barter-System चे कल्पनाचित्र)
 
सुवर्ण, चांदी, तांबे यांच्या मुद्रा असत आणि त्यांना त्यानुसार किंमत असे (जसे सुवर्णमुद्रा तांब्याच्या मुद्रेपेक्षा जास्त किमती वगैरे). भारतात रुपया हे चलन रुजवण्याचे काम 'शेर-शाह-सुरी' या मुघलाने केल्याचे सांगितले जाते.
 
 (शेर-शाह-सुरीचा रुपय्या)
 
इंग्रज आले आणि तुकड्या-तुकड्यां मध्ये वाटलेल्या भारतावर त्यांचा एकछत्री अंमल सुरू झाला. अर्थातच हे सर्व व्यवहार करायला त्यांना एकाच चलनाची गरज होती ती त्यांनी रुपयाच्या रुपाने कायम ठेवली (त्यांचा ब्रिटीश पाउंड ते भारतात रुजवू शकले नाहीत).भारतीय रुपया अगोदर चांदीच्या धातुमध्ये यायचा.
 
  • GOLD STANDARD चा उदय आणि अस्त
फार पुर्वीपासून सोन्याला सोन्यासारखे महत्त्व आहे (Its called universal currency). याचे कारण त्याला असलेले गुणधर्म (गंज न लागणे, लवचिकता, चकाकी वगैरे), त्याला मिळवायला करावे लागणारे श्रम आणि त्याचा दागिण्यासाठी असलेला उपयोग. सोन्यासंदर्भात एक फार छान वाक्य आहे 'we have gold because we cannot trust governments'. म्हणून मग कुठलेही चलन हे सोन्याच्या प्रमाणात व्यक्त केले जाउ लागले. उदा. एखाद्याकडे जर १ रुपया असेल तर त्याला एक रुपयात जेवढे सोने येइल ते देण्याची जबाबदारी त्या-त्या जबाबदार संस्थेची (Issuing authority) असायची. याला GOLD STANDARD असे म्हणतात.
 
आत्ताच्या भारतीय नोटांवर एक मजकुर असतो "मै धारक को xyz रुपया अदा करनेका वचन देता हु!" (xyz च्या जागी योग्य तो आकडा मानावा) त्याचा अर्थच हा की, त्या किंमती एवढा मोबदला.   

                      (भारतीय नोटेवर लिहिले जाणारे वचन)
 
१८०० च्या शतकात ब्रिटीशांनी GLOD STANDARD मानायला सुरुवात केली. थोडक्यात काय तर एखाद्याकडे १-पाउंड असेल तर त्याला त्या किंमतीत येणारे सोने देण्याची जबाबदारी ब्रिटीश सरकारवर होती. ब्रिटीशांच्या असलेल्या जगव्यापी वसाहतींमुळे ते लगोलग जगभर वापरात येउ लागले. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांत ते मान्यता पावले. या GOLD STANDARD चा दोष असा होता कि, एखाद्या सरकारकडे जेवढे सोने असेल तेवढेच चलन ते सरकार बाजारात आणू शकायचे (The currencies were backed by Gold Reserve as collateral). त्यामुळे समजा ब्रिटनने आपला जास्तीचा काही माल ऑस्ट्रेलियाला निर्यात केला आणि त्या निर्याती एवढे ऑस्ट्रेलियन डॉलर ब्रिटनला द्यायला ऑस्ट्रेलियाकडे तेवढे चलन म्हणजेच तेवढे सोने नसेल तर हा व्यवहार कशात करणार ? (How the TRADE will be expressed?). त्यामुळे नंतरच्या काळात ब्रिटन-अमेरिका सहीत सर्वच देशांनी GOLD STANDARD पासून फारकत घेतली. आजच्या मितीला कोणताच देश GOLD STANDARD मानत नाही.
 
  • जागतीक नाणेनिधी (IMF) चा जन्म
दुसऱ्या महायुद्धात युरोपातील बरेचसे देश होरपळून निघाले. त्यामुळे महायुद्धानंतर ते आपल्या अंतर्गत व्यवस्था सावरण्यात गर्क झाले. महायुद्धात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अर्थातच त्यांना पैशांची आवश्यकता होती. यामुळे सर्व देशांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी जगभरातील बहुतांश देश मिळून एक निधी स्थापन करावा असा विचार पुढे आला आणि त्यातुनच IMF(International Monetary Fund) चा जन्म झाला. या महायुद्धात अमेरिकेचे म्हणावे तितके नुकसान झालेच नाही. तसेच IMF ने Gold Exchange Standard हे प्रमाण आणले यात कुठलाही देश १ औंस सोने (२८.३५ ग्रॅम) IMF कडे ठेउन त्याबदल्यात ३५ अमेरिकन डॉलर खरेदी करू शकत. याचा परिणाम असा झाला कि, अमेरिकी डॉलर या चलनाने जुन्या GOLD STANDARD च्या काळातील सोन्याची जागा घेतली. जगभरातील देश डॉलर मध्ये व्यवहार करू लागले. आज जगभरातील ७०% व्यवहार हा डॉलरमध्येच केला जातो.
 
(IMF ची इमारत)
 
IMF वरती असाही आरोप केला जातो कि ते अमेरिकेच्या हातातील एक खेळणे आहे. जे कोणी अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देते त्यांच्या आर्थिक नाड्या अमेरिका IMF च्या माध्यमातून आवळते (उदा. इराण, उत्तर कोरिया यांवरिल आर्थिक निर्बंध वगैरे).

    • विनिमय दराचे गौडबंगाल
     आता जरा आपण विनिमय दर (Exchange Rate) ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींकडे वळुयात. विनिमय दर कसा ठरवावा हे सर्वस्वी त्या देशाच्या सरकारवर आणि त्या देशातील मध्यवर्ती बँकेच्या (central bank) धोरणावर अवलंबून असते.
     
    १) अस्थायी दर (Floating Rate) :- यात त्या देशाच्या चलनाचा विनिमय दर सर्वस्वी मागणी-पुरवठा नुसार हलत असतो. जर एखाद्या देशाच्या चलनाला मागणी वाढली आणि पुरवठा कमी असला तर ते चलन डॉलरच्या तुलनेत वधारते (It gets appreciated) आणि मागणी कमी झाली आणि पुरवठा जास्त असेल तर त्याचे अवमुल्यन घडते (It gets depreciated). आपल्या चलनाचे बाजारातील मुल्य सांभाळतांना मध्यवर्ती बँकेला तारेवरची कसरत करावी लागते आणि डोळ्यात तेल घालून बाजारावर लक्ष ठेवावे लागते. अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रांस, जर्मनी वगैरे देशांनी अस्थायी दर (Floating rate) स्विकारलेला आहे.
     
    २) स्थिर दर (Fixed Rate) :- यात त्या देशाच्या चलनाचे विनिमय मुल्य सर्वस्वी त्या देशाची मध्यवर्ती बँक (central bank)ठरवते. काही अंशी हे सुद्धा बाजारातील मागणी-पुरवठा तत्त्वानुसारच चालते. उदा. एखाद्या देशाने आपल्या चलनाचा विनिमय दर डॉलरच्या तुलनेत वाढीव ठेवला तर इतर देश जे डॉलरमध्ये व्यवहार करतात ते त्या देशाशी व्यवहार कमी करतील त्यामुळे त्या देशाच्या आयात-निर्यातीवर परिणाम होईल आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी त्या देशाला आपले चलन योग्य त्या पातळीवर आणावे लागेल.
     
    चीनने आपल्या चलनासाठी स्थिर दर (Fixed rate) स्विकारलेला आहे. आपल्या युआन(Yuan) या चलनाचे मुल्य कमी ठेवून चीनने आज जगभरातील वस्तुंचे उत्पादन (production and manufacturing)
    स्वतःकडे खेचून घेतले आहे. (गणेशमुर्तींचे सुद्धा स्वस्तात उत्पादन ते करू लागलेले आहेत.) यामुळेच चीनने आपल्या चलनाचे फेरमुल्यांकन करावे असे अमेरिकासहीत सर्व जग त्यांना सांगत आहे. असो.
     
    ३) मिस्र दर (Hybrid Rate) :-  यात त्या देशाचे विनिमय मुल्य थोडे बाजाराच्या हातात (मागणी-पुरवठा नुसार) असते व थोडे मध्यवर्ती बँकेच्या हातात असते. जर त्या देशाच्या चलनाचे बाजारात अवमुल्यन घडायला लागले तर मध्यवर्ती बँक आपल्याजवळ असलेल्या जागतीक चलनाला (Mostly US Dollar) बाजारात देउन आपल्या देशी चलनाचे मुल्य योग्य त्या पातळीवर आणते. जर  ते चलन जागतीक चलनाच्या तुलनेत पातळीबाहेर वधारायला लागले तर बाजारातील जागतीक चलन खरेदी करून देशी चलन योग्य पातळीवर आणते. भारताने रुपयासाठी मिस्र दराची पद्धत स्विकारली आहे. रिझर्व बँकेच्या बाजारातील हस्तक्षेपाच्या बातम्या आपण अधुन-मधून वाचत असतो तो याचाच परिपाक आहे.
     
    एवढे सगळे असुनसुद्धा काही देश व्यापार करतांना वेगळ्या चलनात करू शकतात. उदा. सोवियत-रशिया आणि भारतात पुर्वी रुपया-आणि-रुबल मध्ये व्यवहार झालेले आहेत. ईराण भारताबरोबर भारतीय रुपया मध्ये तेलाचा व्यवहार करण्यास उत्सुक आहे. पण अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्टाला दुखवून कुणालाही अवलक्षण नको आहे त्यामुळे अशा व्यवहारांचे प्रमाण नगण्य आहे.
     
    बऱ्याचवेळा सामान्य माणसाला प्रश्न पडतो कि जर चलन छापण्याचे काम सरकार आणि मध्यवर्ती बँक ठरवते तर जास्त चलन उपलब्ध करून ते देशातील गरीबी का हटवत नाहीत? पण कुठलीही गोष्ट फारच सहज उपलब्ध झाली तर तिचे खरे मुल्य (Instrinsic Value) कमी होते. त्यामुळे जर रोकड फारच सहज उपलब्ध झाली तर जनता त्याचा उपयोग नको तसा करते आणि त्यामुळे महागाइ वाढते (उदा. भारतात २००० च्या दशकात गृहकर्ज सहज उपलब्ध होत त्यामुळे लोकांचा घर घेण्याकडे कल वाढला आणि जागांचे भाव गगणाला भिडले).
    झिंबाब्वे या देशाने आपल्या चलनाचा नको तितका पुरवठा तेथील बाजारात केला आणि तेथे महागाइ (Inflation) २३१,०००,०००%  ने वाढली. याला 'HyperInflation'असे म्हणतात.
     
     
                       (झिंबाब्वे मधील HyperInflation)
     
    वरती बरेच परीच्छेदात आपण 'त्या देशाच्या चलनाची योग्य ती पातळी' असा उल्लेख केलेला आहे. पण योग्य पातळी म्हणजे नेमके काय? (How much good is good ?). एखाद्या देशाच्या चलनाचे डॉलरच्या तुलनेत योग्य मुल्य कसे ठरवतात ? प्रश्न थोडा विचारांत पाडायला लावणारा आहे. या प्रश्नाचे उत्तर आपण जरा उलट पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करू (corollary).
     
    खरेतर खरा विनिमय-दर (Real exchange rate) ठरवण्याची कुठलीही शास्त्रीय पद्धत चर्चीली गेल्याचे दिसत नाही. ते बऱ्याच अंशी त्या त्या देशाच्या परिस्थिती आणि सरकारवर ठरते.
     
    अर्थशास्त्रात एक नियम आहे 'Law of one Price'(LOOP) त्याचे वाक्य असे आहे 'A good must sell for the same price in all locations'. ढोबळमानाने ते असे सांगते कि, एका परिपुर्ण व्यवस्थेत (Perfect Market) कुठल्याही वस्तुची किंमत ही जगभरात सारखी राहण्याच्या प्रयत्न करते. यासाठी McDonald या अमेरिकन food-chain च्या BigMac या Burger चे उदाहरण दिले जाते याला कारण जगभरात McDonalds च्या असलेल्या शाखा (Franchise) आणि सर्वच ठिकाणी ते बनवण्याची समान पद्धत (assembly line). जर वाहतुक (Transport) आणि इतर मध्यमांचा (Intermediaries) खर्च वगळला तर BigMac बनवण्यासाठी येणारा खर्च अमेरिकेत आणि कुठल्याही देशात सारखाच असला पाहिजे. असे हा नियम सांगतो.
     
    आपण युरो आणि डॉलरच्या विनिमयाचे उदाहरण घेउ. उदा. अमेरिकेत BigMac बनवण्याचा खर्च २ डॉलर आहे तोच खर्च फ्रांसमध्ये जर १ युरो असेल तर ढोबळमानाने बाजारात १ युरो= २ डॉलर असे विनिमय मुल्य असावे असा वरिल नियम सांगतो. जर तसे नसेल आणि बाजारात १ युरो = १ डॉलर असा दर चालू असेल तर McDonald लगेचच हे BigMac फ्रांसवरून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आयात करण्याचे योजू शकेल कारण अमेरिकेतील २ डॉलर ऐवजी त्यांना फ्रांसमध्ये एकच डॉलर खर्च येणार आहे. अशाप्रकारे BigMac तयार करण्याचा खर्च जगभरात सारखा राहण्याचा प्रयत्न करेल आणि ते खरे विनिमय दर ठरवायला मदत करू शकते असे अर्थतज्ञ मानतात.
     
    वस्तु(Goods), सेवा(Services), क्रयवस्तू(Commodities) यांच्या भावात दोन-देशांत भिन्न किंमत (डॉलरच्या रुपात सुद्धा) असू शकते.  यालाच 'Disparity' (तफावत) असे म्हणतात आणि मग जगभरातले उद्योजक याचा फायदा उठवण्यासाठी त्या देशात गर्दी करतात. उदा. iPhone हे उत्पादन चीनमध्ये बनवण्याचा खर्च केवळ काही डॉलर आहे तोच iPhone अमेरिकेत २०० डॉलरच्या पुढे खपत होता.
     
     
    विकसनशील देशांवर (developing economies) असाही आरोप होतो आहे कि, या देशांनी आपले विनिमय-दर कमी ठेवून किंवा अवमुल्यन करून जगभरातील उध्योग (production and manufacturing) आणि सेवा (services) आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत त्यांमुळे विकसित देश (developed economies) कधी नव्हे तितके त्यांच्यावर अवलंबीत झाले आहेत. आणि जगासाठी इतके ध्रुवीकरण (Polarization) चांगले नाही.
     
    अशाप्रकारे विनिमय दरामुळे येणाऱ्या असमतोलाचा (disparity) फायदा पुढारलेले देश कायमच घेतात आणि गरिब देशांना वास्तव स्विकारण्याशिवाय इतर पर्याय नसतात.  
    रुपया घसरणीला कारणीभुत असलेल्या घटकांचा आढावा आपण पुढिल भागात घेउ.

    (वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)

    Tuesday, September 03, 2013

    सबसे छोटा रुपय्या - भाग-१

    अकबराच्या नगरात एक 'दुर्मुख' नावाचा माणुस राहत असतो. त्याचे तोंड पाहिले कि दिवस चांगला जात नाही असा समज त्या नगरात असतो. एकदा अकबर सकाळी रपेट मारायला निघतो आणि दुर्मुखचे तोंड पाहतो. तो दिवस अकबराला अजिबात चांगला जात नाही. अकबर विचारांत पडतो कि असे का झाले ? त्याला जाणवते कि त्या दिवशी सर्वप्रथम त्याने दुर्मुखचे तोंड पाहिले होते. तो फर्मान सोडतो कि दुर्मुखला फाशी देण्यात यावी कारण त्याचे तोंड पाहिले की सर्व उलटे घडते. बिरबलाला हि बातमी समजते. भरलेल्या दरबारात अकबर बिरबलाला विचारतो कि, "अशा अपयशी माणसाला जगण्याचा काहीही अधिकार नाही म्हणून त्याला फाशीची शिक्षा फर्मावली आहे यावर तुला काही म्हणायचे आहे काय?" बिरबल उत्तरतो "महाराज, आपला निर्णय बरोबरच आहे. अशा माणसाला जगण्याचा काहिही हक्क नाही. पण मला दुर्मुखला एक प्रश्न विचारायचा आहे". अकबर प्रश्न विचारायला परवानगी देतो. बिरबल दुर्मुखला विचारतो कि "त्या दिवशी तु सर्वप्रथम कुणाचे तोंड पाहिले ?". दुर्मुख थोडा बुजतो पण उत्तर देतो कि त्याने त्या दिवशी सर्वप्रथम महाराज अकबराचे तोंड पाहिले होते. बिरबल अकबराला म्हणतो "महाराज, याने ज्याचे तोंड बघीतले तो जास्त अपयशी कि आपण ज्याचे तोंड बघीतले तो जास्त अपयशी ? कारण याने त्या दिवशी ज्याचे तोंड पाहिले त्यादिवशी याला फाशीची शिक्षा झाली." अकबराला आपली चुक उमजते आणि तो आपला निर्णय मागे घेतो. दुर्मुख बिरबलाला त्याच्या बुद्धीचातुर्याबद्दल आणि त्याचा जीव वाचवल्या बद्दल लाख लाख धन्यवाद देतो.

    नजीकच्या काही महिन्यात (मे-२०१३) रुपया हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत फारच घसरला (५० पासून ते ६९ पर्यंत) आणि अर्थमंत्रालय रिझर्व बँकेकडे बोट दाखवायला लागले आणि रिझर्व बँक अर्थमंत्रालयाकडे. अकबराच्या वरिल कथेप्रमाणे दोघांनी एकमेकांचे तोंड सकाळी उठतांना पाहिले असे म्हणायला हरकत नाही.



    सरकारने याचे लगेचच उत्तर म्हणून 'चालू खात्यातील तुट' (Current Account Deficit or CAD) याला कारणीभुत असल्याचे सांगितले आणि आयात (Import) कमी करण्याचे उपाय योजले. पण याचा एवढाच संकुचीत विचार करून समस्या समजून येत नाहीये कि रुपया आत्ताच एकदम एवढा का घरंगळला (Free Fall)?

    चला जरा हे थोडे समजण्याचा प्रयत्न करुयात. आपण अगोदर हे सर्व वेगेवेगळ्या तुकड्यांत मांडू (Work Breakdown) आणि नंतर त्या मांडलेल्या तुकड्यांची जुळवणुक (Integrate) करून एक परिपुर्ण चित्र (Complete Picture) मिळते का ते बघु.
     

    • रिझर्व बँकेचा अर्थव्यवस्थेतील सहभाग

    कुठल्याही देशात त्याचे पतविषयक धोरण हे त्या देशाची Central Bank ठरवते. भारतात तीला 'रिझर्व बँक' म्हणतात अमेरिकेत तीला 'फेड' (FED) असे म्हणतात. भारताच्या बाबतीत बोलायचे तर अर्थमंत्रालयाच्या कक्षेत येउ पाहणारी ती एक स्वायत्त संस्था (autonomous - जसे भारतीय न्यायालये (Judiciary)) आहे. घटनेने तीला आपल्या कक्षेत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. रिझर्व बँक इतर सर्व बँकांसाठी धोरण ठरवते म्हणुनच रिझर्व बँकेला 'Banker to Banks' असेही म्हणतात. भारतीय रुपयाचे मुल्य सांभाळण्याचे महत्वपुर्ण कार्य रिझर्व बँकेकडून केले जाते.

    कुठल्याही देशाचे अर्थविषयक धोरण हे प्रामुख्याने दोन भागात विभागता येते.

    १) Fiscal Policy :- एका वित्त वर्षात सरकार पैसा कसा गोळा करणार आणि कशापद्धतीने खर्च करणार याचा समावेश यात असतो.  यात करांविषयीची (taxes) तरतुद येते. अर्थमंत्रालयाच्या अधिकारात हे क्षेत्र येते.


    २) Monetary Policy :- एखाद्या वित्त वर्षात नोटा किती छापाव्या, बँकांना देण्यात येणाऱ्या कर्जांचा व्याजदर (Base Rate) किती असावा, रुपया आणि परकिय चलन याचा योग्य तो साठा किती असावा अशा घटकांचा यात समावेश होतो. रिझर्व बंकेच्या अधिकारात हे सर्व येते.
    • उद्योगांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग
    देशात किंवा देशाबाहेर लागणाऱ्या वस्तू आणि सेवांचे (Goods and Services) उत्पादन आणि वितरण हे उद्योगधंद्यांचे प्रमुख कार्य. ते चालवण्यासाठी बँका अशा उद्योगांना कर्जे उभारून देतात. अर्थातच अशा कर्जांचा दर हा रिझर्व बँकेने ठरवून दिलेल्या Base Rate पेक्षा जास्त असतो नाहीतर बँका आपला नफा कुठून मिळवणार ? बऱ्याच वेळा उद्योगधंद्यांना परदेशी कर्जे देशातील बँकांपेक्षा स्वस्त मिळतात त्याला External Commercial Borrowings असेही म्हणतात. ते कर्ज परदेशी चलनात मिळाले तर त्याची परतफेडसुद्धा परदेशी चलनातच करावी लागते. म्हणुन मग अशा प्रकारच्या कर्जांसाठी रिझर्व बँकेची परवानगी लागते कारण कि कर्ज परतफेडीसाठी परदेशी चलन उपलब्ध करून देणे आणि त्याचा योग्य तो साठा ठेवणे हे रिझर्व बँकेचे कामच आहे.
    उद्योगांना उत्पादनासाठी बऱ्याचवेळा कच्चामाल परदेशातून आयात (Import) करावा लागतो त्यासाठी परदेशी चलन लागते. अर्थातच ते चलन योग्यवेळी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रिझर्व बँकेची आहे.  जेंव्हा उद्योग एखाद्या वस्तुची किंवा सेवेची परदेशी निर्यात करतात तेंव्हा परदेशी चलन देशाला मिळते. 
    • सरकारचा अर्थव्यवस्थेतील सहभाग
    देशातील सरकारचा प्रथम उद्देश हा लोककल्याण असावा असा अलिखित संकेत आहे.तर मग यासाठी सरकार काय करते तर देशातील जनतेला रोजी रोटी कमावण्यासाठी नोकऱ्या निर्माण करते त्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देते त्यासाठी सुसंगत अशा कायद्यांची तरतुद करते (e.g. SEZ, Land Acquisition Act etc),उद्योगांना कमी व्याजदरात कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व बँकेला निर्देश देवू शकते.
    जनतेला दैनंदिन लागणाऱ्या वस्तू जर देशांतर्गत बनत नसतील तर त्या आयात कराव्या लागतात (जसे कच्चे-तेल (Crude Oil), यंत्रांचे सुटे भाग (Spare Parts), कोळसा, धातू वगैरे ) यासाठी अर्थातच परदेशी चलन लागते. ते कसे मिळेल याचा सातत्याने विचार सरकारला करावा लागतो. बऱ्याचवेळा मग सरकार परदेशी वित्त संस्थांकडून कर्जे घेते. तसेच परदेशी उद्योगांना भारतात थेट गुंतवणुकीसाठी (Foreign Direct Investment or FDI) योग्य तशा तरतुदी बनवते किंवा परदेशी वित्त संस्थांना (Foreign Institutional Investor or FII) भारतीय उद्योगांत गुंतवणुकीसाठी शेअर बाजारात उलाढाल करण्याची परवानगी देते. परदेशी गुंतवणुकदार आकर्षित करण्यासाठी कधी-कधी सरकार रुपयाचे अवमुल्यन (Devaluation) स्वतः होउन करते. यामुळे परदेशी गुंतवणुकदाराला त्याच्या ठराविक गुंतवणुकीचे जास्त रुपये मिळतात आणि तो भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित होतो. यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लागणारे अत्यंत उपयुक्त असे परदेशी चलन सरकारला उपलब्ध होते. अर्थातच मिळालेल्या देशी किंवा परदेशी चलनाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी रिझर्व बँकेची असते हे नवीन सांगायला नको.
    एखादी कंपनी गुंतवणुक योग्य आहे कि नाही याचे विश्लेषन अर्थतज्ञ त्या कंपनीच्या Balance-Sheet व Profit & Loss Account वरून ठरवतात तसेच देशाचे सुद्धा विश्लेषन करता येते. त्यांच्या किचकट जंत्रीत न पडता आपण फक्त आपल्याला पुढे लागणाऱ्या दोन संज्ञा समजून घेउ.
    भांडवली खाते (Capital Account) :- देशात आलेली अंतरराष्ट्रीय गुंतवणुक (FDI, FII, Remittanced etc) आणि देशाबाहेर गेलेले चलन (FII Outflow, Installments of ECB etc) यांचा समावेश यात असतो. हे खाते देशाची गुंतवणुक खेचण्याची क्षमता (Investment Potential) दर्शवते.
    चालू खाते (Current Account) :- देशात घडणाऱ्या आयात-निर्यात (Import-Export) यांचा समावेश यात असतो. हे खाते देशाची व्यापार-स्थिती (Trade Position) दर्शवते.

                       (चालू खाते + भांडवली खाते)
      
    १९९१ नंतरच्या आर्थिक सुधारणांनंतर भारताचे भांडवली खाते हे वाढिव राहिले आहे (Capital account surplus) तर चालू खाते हे कायम तुट (Current account deficit) दर्शवित आले आहे. चालू खात्यातील हि तुट भांडवली खात्याने कायमच भरून काढली आहे.
    रिझर्व बँक - अर्थमंत्रालय - उद्योग - सरकार आणि देश यांची एकमेकांत असलेली विचित्र पण महत्त्वाची गुंफण आपण वरिल भागांत पाहिली.

    विनिमय दराचे गौडबंगाल आपण पुढिल भागात पाहु.


    (वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

    ( बऱ्याच वाचकांनी मला मागे झालेल्या सब-प्राइम क्रायसिस, युरोपियन क्रायसिस यांवर विचारले. यावरती माझी ब्लॉग-पोस्ट 'काय भुललासी वरलिया रंगा'  पहावी. )

    Friday, August 02, 2013

    पेटंट (?) बी पेशंट -- भाग २

    पेटंट त्याची पार्श्वभुमी आणि त्याचे महत्व आपण मागील लेखात ( पेटंट (?) बी पेशंट -- भाग १ ) वाचले असेल. आता आपण त्याचे महत्व औषधनिर्मिती क्षेत्रात कसे आहे हे समजून घेउ. (औषध म्हणजे Allopathy औषधे येथे अभिप्रेत आहेत)

    औषध निर्मिती क्षेत्रात (Pharma Industry) कंपन्यांचे  वरकरणी दोन प्रकार पडतात.

    १) ईनोव्हेटर (Innovator/Brand):- अशा प्रकारच्या कंपन्यांना त्या औषधांच्या प्रथम निर्मितीचे श्रेय जाते. कुठलेही औषध  बाजारात येइपर्यंत वेगवेगळ्या चाचण्यांमधून जाते. बऱ्याचशा कंपन्या प्रथम त्या औषधाची चाचणी संगणकावर वेगवेगळे मॉडेल करून घेतात नंतर वनस्पती आणि प्रांण्यांवर (Plants and Animals) त्यांचा प्रभाव तपासला जातो. नंतरची पातळी हि त्या रोगांच्या पेशंटवर व निरोगी माणसावरसुद्धा (Subject or Volunteers) घेतली जाते. ह्या चाचण्या Clinical Trials या नावाने ओळखल्या जातात. या चाचण्या एखादी वेगळी कंपनीसुद्धा घेउ शकते त्यांना Clinical Research Organizations (CRO) असे म्हणतात. या चाचण्यांचे परिणाम, त्याचे निष्कर्ष हे सगळे जतन करून अन्न आणि औषध प्रशासनाला (Food and Drug Administration - FDA) संमतीसाठी पाठविले जातात. त्यांच्या संमतीनंतरच ते औषध बाजारात येउ शकते. त्या औषधाची किंमत अर्थातच इनोव्हेटरच्या मनावर ठरते. याचे पेटंट अर्थातच 'इनोव्हेटर'ला दिले जाते. बऱ्याचशा देशांत हे पेटंट २० वर्षांसाठी दिले जाते. हिशोब हा कि, २० वर्षात त्या औषधावरिल संशोधनाचा खर्च तसेच योग्य तो नफा इनोव्हेटरला मिळावा.

    पश्चात्य देशांत बरेचसे संशोधन हे सरकार पुरस्कृत (Government Funded) असते. त्यात औषधांवरिल संशोधनसुद्धा मोडते. इनोव्हेटर कंपन्यांवर आरोप होतात कि, या कंपन्या असे चाललेले संशोधन एका ठराविक टप्प्यात आले कि त्याचे हक्क विकत घेतात आणि आपल्या नावावर खपवतात. जर ते सरकार पुरस्कृत असेल तर ते जनतेने भरलेल्या करामधुनच केल्यासारखे आहे मग जनतेने या इनोव्हेटरना त्यांच्या औषधाची मनमानी किंमत (Premium Price) का द्यावी ? प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

    बऱ्याचशा इनोव्हेटर कंपन्या अमेरिका व युरोपातील आहेत जसे Pfizer, Bayer, Novartis etc.

    २) जेनेरिक (Generic):- इनोव्हेटरने शोधलेले औषध २० वर्षांच्या पेटंटनंतर (off patent drug) इतर कंपन्यांना निर्मितीसाठी खुले केले जाते. यामागे उदात्त हेतू हा कि, ते औषध कमी किंमतीत मानवजातीसाठी उपलब्ध व्हावे कारण त्या कंपन्यांना यावर संशोधनाचा खर्च येणार नसतो तो २० वर्ष अगोदरच इनोव्हेटरने केलेला असतो. अशा कंपन्यांना जेनेरिक (Generic) कंपनी असे म्हणतात. यांनासुद्धा त्या तयार करत असलेल्या औषधांच्या चाचण्या, त्यांचे निष्कर्ष अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) मंजुरीसाठी पाठवावे लागतात.

    भारतातील औषधनिर्मिती क्षेत्रातील सर्वच कंपन्या या पेटंट संपलेल्या औषधाचे (Off Patent Drugs) उत्पादन करतात. भारत जगात जेनेरिक औषधनिर्मितीत अग्रणी आहे. थोडक्यात आपल्याला नक्क्ल करण्यात कसब आहे.




    पेटंट आणि त्याभोवती खेळले जाणारे राजकारण याचा आपण जरा वेध घेउयात.

    * Patent Evergreening:- बरेचशे इनोव्हेटरहे अव्वाच्या सव्वा भावात आपले उत्पादन बाजारात विकतात. खुल्या बाजारात (Free Market Economy) त्याला आव्हानसुद्धा तकलादू ठरतात. शाश्वत उत्पन्न देणाऱ्या अशा 'सोन्याच्या कोंबडीला' जस्तीत जास्त काळ आपणाबरोबर ठेवण्याचा मोह कुणाला होणार नाही ? म्हणून मग पेटंट घेतल्यानंतर ठराविक वर्षानंतर (५-१० वर्षे) इनोव्हेटर त्या औषधाच्या घटकांत (Formula) बदल करून त्या औषधाची सुधारीत आवृत्ती मंजुरीला पाठवतात. याला मंजुरी मिळताच पुढील २० वर्षांसाठी बाजारपेठेवरील मक्तेदारी (Monopoly) त्या इनोव्हेटरला निश्चित करता येते. याला न्यायीक आव्हान जरी दिले तरी यात समाविष्ट होणाऱ्या बऱ्याचशा क्लिष्ट वैज्ञानिक संशोधनामुळे बऱ्याचवेळा इनोव्हेटरच जिंकतो. याला 'Patent Evenrgreening' असे म्हणतात.
    भारतात असे खपवून घेतले जाणार नाही असे सरकारने वारंवार या कंपन्यांना सांगितले आहे. अर्थात अजुनतरी Patent Evergreening च्या केसेस तितक्याशा चर्चिल्या गेलेल्या नाहीत.



    * Compulsory Licensing:- गरिब किंवा विकसनशिल देशांत एखाद्या रोगांवरिल औषधांवरिल उपचार त्या देशातील चलनानुसार अतिशय महागडा ठरू शकतो. परंतु त्या रोगाची व्याप्ती आणि लोकांमध्ये असलेली त्याची नितांत गरज बघता एखादी जेनेरिक कंपनी ते औषध तयार करू शकते आणि त्याचे पेटंट असलेल्या इनोव्हेटरला बाजारभावाप्रमाणे मोबदला (Royalty) अदा करू शकते. त्या देशातील न्यायालयसुद्धा याचा सहानुभुतीपुर्वैक विचार करून जेनेरिक कंपनीला अशी संमती देउ शकते.

                        

    भारतात २०१२ मध्ये असे पहिले Compulsory Licensing नॅटको फार्मा (Natco Pharma) या कंपनीला कर्करोगावरिल औषधासाठी देण्यात आले. त्या औषधाचे पेटंट बायर (Bayer) या कंपनीकडे आहे.

    * Period of Exclusivity:- काही बाबतीत अन्न आणि औषध प्रशासन (FDA) जेनेरिक कंपनीला १८० दिवसांचा अवधी (Period of Exclusivity) देतात.  या कालावधीत एक (किंवा काही बाबतीत आणखी काही) जेनेरिक कंपन्या ते औषध उत्पादित करू शकतात. यामुळे त्या जेनेरिक कंपनीला आपले जेनेरिक उत्पादन स्थिरावयाला मदतच होते. हा कालावधी म्हणजे जेनेरिक कंपनीने त्या औषधाच्या पेटंटला दिलेले आव्हानच असते. यात त्याला हे शाबित करावयाचे असते कि ते पेटंट चुकिचे आहे किंवा जेनेरिक उत्पादनामुळे मुळ पेटंटला कुठेही धक्का पोहोचत नाही.  परंतु खरे तर हा अवधी जेनेरिक कंपनी इतर जेनेरिक कंपन्यांना बाजारपेठेपासून दुर ठेवण्यासाठिच वापरतात.

    * Authorized Generics:- बाजारात इनोव्हेटरला आपली मक्तेदारी आणि स्थान अबाधीत ठेवायचे असते. पेटंट संपताच जेनेरिक कंपन्यांची टोळधाड त्याचे स्थान कधीही हिरावून घेउ शकतात म्हणून मग इनोव्हेटर कंपन्या वेगवेगळ्या क्ल्रुप्त्या लढवतात. इनोव्हेटर कंपनी आपल्याच उप-कंपनीला पेटंटेड औषधाची जेनेरिक आव्रुत्ती काढून बाजारात स्थान मिळवायला मदत करते यामुळे पेटंट कालावधी (२० वर्षे) संपला तरी इनोव्हेटर कंपनीला आपले स्थान जेनेरिक आव्रुत्ती काढून अबाधीत ठेवता येते. अशा जेनेरिक कंपन्यांना 'Authorized Generics' असे म्हणतात.

    न्यायालयीन क्लिष्टतेपासून वाचन्यासाठी इनोव्हेटर एखाद्या कंपनीला संगनमताने जेनेरिक आव्रुत्ती पेटंट संपताच बनवण्यासाठी मदत करतात. त्याचे बाजारातील हक्क जेनेरिक कंपनीच्या हाती आले कि ती कंपनीच विकत घेतात आणि बाजारपेठेवरिल आपली पकड कायम ठेवतात.

    थोडक्यात सांगायचे तर जितके कायदा त्याच्या कितीतरी प्रमाणात पळवाटा. अमेरिका आणि युरोपात तर अशा प्रकारच्या केसेस सारख्या चालुच असतात. बौद्धिक संपदा (Intellectual Property) संरक्षणासाठी तेथे वकिलांचा वेगळा वर्गच आहे त्यांना IP-Lawyers असे म्हणतात.

    भारतात पेटंट विषयी असलेल्या अनभिज्ञतेबाबत 'ह्रिषिकेश कृष्नन' यांचा  'Patents are not just about pharma' हा लेख फारच माहितीपुर्न आहे.

    भारतात अमेरिकन इनोव्हेटर कंपनी विरुद्ध भारतीय जेनेरिक कंपनी अशा केसेस भविष्यात पाहवयास मिळतील. या लढाया केवळ भारतापुरत्याच मर्यादित नसतील त्या जगात वेगवेगळ्या देशांतील न्यायालयात लढल्या जातील. एखाद्या देशात जिंकलेला लढा तीच कंपनी दुसऱ्या देशात हरू शकते याला कारण देशांदेशांत असलेले वेगवेगळे कायदे.

    शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात ते उगीचच नाही !!!


    (वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  
     

    Wednesday, April 17, 2013

    पेटंट (?) बी पेशंट -- भाग १

    सचिनला आज जरा क्रिकेटची प्रॅक्टीस करतांना खरचटले. तो थोडासा अडखळतच घरी आला. त्याचा हिरमुसला चेहरा पाहुन आजीला कळले की स्वारीला आज बरे नाहिये. आजीने लगेच चौकशी केली आणि आपला बटवा आणायला सांगितले. बटव्यातील आंबी - हळद काढून त्याच्या जखमेवर लावली आणि निश्चिंत झाल्या.
    आजींना जर कळाले कि त्यांनी नुकताच एका पेटंटचा वापर केला आहे आणि त्या बदल्यात त्यांना काही फी (Royalty) हि त्या पेटंट ज्याच्या नावे आहे त्याला द्यावी लागेल तर केवढा गदारोळ होइल ? तरी बरे कि आजीबाईंच्या बटव्यावर अजुनतरी पेटंट कुणाला देण्यात आलेले नाही त्यामुळे आपण त्याचा बिनधास्त वापर करतो.
    सर्वोच्य न्यायालयाने नुकतेच 'नोव्हार्टीस' या स्वीस कंपनीला रक्ताच्या कर्करोगावरील औषधाचे (Glivec) पेटंट भारतात नाकारले आणि पुन्हा जागतीक पेटंट आणि भारतीय पेटंट कायदे हा विषय चर्चेत आला.

    पेटंटचे महत्त्व

    सर आयझॅक न्युटन यांनी कुठेतरी म्हटले आहे 'आपण आपल्या पुर्वजांच्या खांद्यावर चढून हे जग पाहत असतो (We stand on the shoulder of giants).त्यांना म्हणायचे होते कि त्यांच्या अगोदरच्या शास्त्रज्ञांच्या पीढीने मुलुभुत संशोधन करून पाया रचून ठेवला आहे आपण त्याच्या वापर करून पुढे जात असतो. आपल्या संशोधनापायी 'गॅलीलीओ'ला आपले आयुष्य वेचावे लागले (कर्मठ चर्चने शिक्षा केली). लसीकरणाची (vaccination) पद्धत शोधणाऱ्या 'एडवर्ड जेन्नर' याने तो प्रयोग एका छोट्या मुलावर केला होता. तो जर अयशस्वी झाला असता तर त्याची काही गय जगाने केली नसती.एडीसन (ज्याच्या नावे अजुनही पेटंटचा विक्रम आहे) ज्या रेल्वेगाडीत वृत्तपत्र विकत आणि संशोधन करीत त्यात आग लागली होती आणि ते सर्व त्यातून थोडक्यात बचावले होते.

    तर असे हे आपले पुर्वज आणि अशा या त्यांनी घेतलेल्या जोखीमा (Risks).त्यांनी जर या जोखीमा घेतल्या नसत्या तर आपण आहोत तेवढे सुखी निश्चीतच नसतो. न्युटनचे वाक्य किती समर्पक आहे.

    अशा जोखीमा घेउन मानवजातीच्या भल्यासाठी काम करणाऱ्याचा उचीत गौरव म्हणून त्यांना पेटंट (स्वामित्व हक्क) देण्यात आले तर त्यात खचितच काहीही गैर नाही.या पेटंटचा वापर जर कोणी काही बाजारु-उत्पादनात करत असेल (जसे कि पोलिओसाठी लस) तर त्याचा विक्रीतील उचीत भाग (Royalty) हा त्या संशोधकाला देण्यात यावा या मताला कोणाचीच हरकत नसावी. हे पेटंट म्हणजे त्या संशोधकाच्या बौद्धीक-संपत्तीचे (Intellectual Property) केलेले रक्षण आहे. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, लोगो वगैरे हे प्रचलीत हक्क (Rights) रक्षणाची हत्यारे आहेत.त्यांच्या किचकट कायदेविषयक व्याख्येमध्ये न जाता आपण या चर्चेपुरते आपले लक्ष पेटंट वरतीच ठेवु.

    पेटंटची पार्श्वभुमी

    जगातील पहिले अधिकृत नोंदणी झालेले पेटंट हे इटली मध्ये १५व्या शतकात घेतल्याची नोंद आहे.जगात प्रत्येक देशाचे पेटंट विषयी वेगवेगळे नियम आहेत. त्यांमुळे एखादे संशोधन हे एका देशात जरी पेटंट करून घेतले तरी त्याचे पेटंट हे दुसऱ्यादेशातही दिले जाइल याची काहिच शाश्वती देता येत नाही.यात जागतिक व्यापार संघटनेने (World Trade Organization-WTO) सुसुत्रता आणायचा प्रयत्न केला आहे पण तो पुरेसा नाही.
    भारतात १९६५ चा पेटंट कायदा प्रमाण मानला जायचा. यानुसार भारतात फक्त प्रक्रियेसाठीच पेटंट(Process Patent) देण्यात येत, उत्पादनासाठी (Product Patent) नाही.उदा. उसापासून साखर तयार करणे हि झाली प्रक्रिया आणि साखर हे झाले उत्पादन.परंतु आपण जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य झालो आणि आपल्याला आपले पेटंट विषयक धोरण २००५ पर्यंत बदलणे बंधनकारक ठरले.आता बदललेल्या नियमानुसार भारतात उत्पादनावर सुद्धा पेटंट (Product Patent) घ्यायला मंजुरी आहे. मध्यांतरी कुणीतरी अमेरिकेत आंबी - हळदीच्या औषधी गुणधर्माविषयी पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला. तो भारत सरकारने तेथील कोर्टात हानून पाडला.ते जर पेटंट दिले गेले असते तर भारतात जिथे कुठे आंबी - हळद औषध म्हणून वापरली जाते त्या सर्वांना या पेटंट घेणाऱ्या महाभागाला फी (Royalty) द्यावी लागली असती.कारण जागतिक व्यापार संघटनेच्या नियमावलीनुसार हे पेटंट भारतातही मिळवण्याचा मार्ग त्या महाभागाला सुकर झाला असता.

    अमेरिकेतल्या ऍपल (Apple) या कंपनीने आपल्या दुकानातील (Apple-stores) पायऱ्यांच्या (Steps) डिझाइनचेसुद्धा पेटंट घेतलेले आहे. हे कमी म्हणून कि काय आपल्या iPhone या उत्पादनात असलेल्या Round-Edges चे सुद्धा पेटंट त्यांनी घेतल्याचे ऐकिवात आहे.अमेरिकेत अक्षरशः कशाचेही पेटंट घेता येते का असाच प्रश्न पडतो.



    भारतीय भुखंड, चीन, अफ्रिका अशा देशांत अजुनही बौद्धिक संपत्ती (Intellectual Property)संरक्षणाविषयी तितकिशी जागरुकता नाही त्यामुळे याचे सर्रास उल्लंघन दररोजच होत असते. उदा. रस्त्यांवर विकली जाणारी महागड्या पुस्तकांच्या हलक्या दर्जाच्या पण स्वस्त प्रती (Cover versions) ,पायरेटेड डिजिटल कंटेंट (Softwares, Movies, eBooks, Torrents etc).

    असे उल्लंघन अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातसुद्धा होते. डॉ. रॉबर्ट कर्न्स (Robert Kerns) यांचे Intermittent Windshield Wiper हे संशोधन फोर्ड मोटर कंपनीने परस्पर आपल्या मस्टँग (Mustang) या उत्पादनात चोरून वापरले. शेवटी किचकट न्यायालयीन प्रक्रियेनंतर डॉ. कर्न्स यांना न्याय मिळाला पण या सर्व लढाइमध्ये त्यांना आपल्या कुटुंबापासून विभक्त व्हावे लागले.त्यांच्यावरील 'Flash of Genius' हा माहितीपट आवर्जून पाहावा असाच आहे.





    फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्गवर सुद्धा फेसबुक ही संकल्पना एका 'हार्वड-कनेक्शन' या तीन-मित्रांनी मिळुन बनवलेल्या कल्पनेतुन उचलल्याचा आरोप होतो.त्याबद्द्ल त्याला दंडही भरावा लागल्याचे बोलले जाते.याचे फारच सुंदर चित्रण 'Social Network' या हॉलिवुडपटात आहे.



    पण सर्वच संशोधक केवळ पैसा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन संशोधन करत नसतात.ज्या माहितीजालावर (Internet) बसुन तुम्ही हा लेख वाचत आहात, त्याचा जनक 'टीम बर्नर्स ली' हा जीनेव्हा येथील भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत (CERN laboratory of partical physics) नोकरीला होता.वारंवार लागणारी माहिती कुठेतरी योग्यत्या रुपात साठवता यावी आणि कोठुनही त्याच रुपात दिसावी यासाठी त्याने World Wide Web (WWW) या संकल्पनेला तयार केले ( He wrote the first Web-Server ' CERN httpd' and first Web-Browser 'Lynx' visit: http://info.cern.ch/). जर त्याने त्याचे पेटंट घेतले असते तर संगणकावर माहितीजालातुन येणाऱ्या प्रत्येक Bit साठी आपणाला किंमत (Royalty) मोजावी लागली असती. आपले संशोधन सामान्यापर्यंत पोहोचावे म्हणुनच त्याचे पेटंट न घेतल्याचे 'टीम ली' बोलला. टाइम मॅगॅझीनने त्याचा गौरव केला. ब्रिटनच्या राणीने त्याला मानाचा 'KnightHood' किताब प्रदान केला.



    तर असे हे संशोधक, असे त्यांचे संशोधन, असे त्यांचे पेटंट !!! पेटंटची ही कहानी औषधनिर्मिती क्षेत्रात (Pharma) कशी लागु होते आणि सामान्य मानसापर्यंत त्याची व्याप्ती कशी येते ते पुढील प्रकरणात पाहु.

    (वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

    Thursday, April 22, 2010

    गृहकर्ज पहावे फेडुन

    "घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करुन" अशी आपल्याकडे एक जुनी म्हण आहे. त्यात आणखी एकाची भर घालाविशी वाटते ते म्हणजे "गृहकर्ज पहावे फेडुन" ची.  भर एवढ्याचसाठी घालावीशी वाटते कि, गृहकर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेने आपले नियम स्वतःच्या फायद्यासाठी असे काही बनवले आहेत कि एखाद्या तज्ञ सल्लागारालासुद्धा चक्कर येइल तर सामान्य माणसाचे काय?


    मी एका नामांकित वित्तसंस्थेकडुन गृहकर्ज(Housing Loan) 2004 साली तरल (Floating) व्याजदराने घेतले. हा व्याजदर खालील पद्धतीने ठरवला जातो.
                 BPLR - SPREAD = RATE OF INTEREST.
    बरे यात गोची अशी कि, वित्तसंस्था हे BPLR कधीही बदलू शकते (बऱ्याचवेळा तो वाढतोच आहे.) तसेच SPREAD सहजासहजी बदलता येत नाही. याचाच अर्थ 'RATE OF INTEREST' वाढतच जातो. बरे जुन्या खातेदारांना वाढत्यादराने आणि नवीन खातेदारांना सवलतीच्या दराने तो आकारला जातो. हे काय गौडबंगाल आहे? आणि नवीन खातेदार जुना झाला कि तो सुद्धा जाणुनबुजन दुर्लक्षीला जातो. प्रश्न विचारला तर उत्तर मिळते 'Cost of Funds'. सर्वांना समान अधिकारासाठी प्रसिद्ध असलेल्या लोकशाहीत असा दुजाभाव कसा चालतो?


    SPREAD जर वाढवायचा असेल (म्हणजेच 'RATE OF INTEREST' कमी करायचा असेल ) तर वित्तसंस्थेतर्फे कधी-कधी योजना आणल्या जातात. यात अजून एक गोची अशी कि, या योजनांची (Schemes) माहीती कुठल्याही माध्यमाद्वारे जुन्या ग्राहकांपर्यंत वित्तसंस्थेतर्फे स्वतः होऊन पोहोचवली जात नाही. जर तुमचे त्या वित्त संस्थेत महिन्याला येने-जाने असेल तर तिथला अधिकारी तुम्हाला अशा योजनांची माहिती देतो. आता बरेचसे ग्राहक कटकट नको म्हणुन ECS (Electronic Clearance) करून मोकळे होतात त्यामुळे वर्ष-वर्ष तो गृहकर्जाकडे बघत नाही आणि या योजनांपासून दुर लोटला जातो. उद्याजर कोणी विचारलेच तर सांगता येते कि अशी योजना होती पण तुम्हीच त्याचा लाभ घेतला नाही. हा प्रकार 'नरो वा कुंजोर वा' सारखा आहे. याउलट त्यांच्या EMI चा Cheque एखादा महिना उशीरा द्या, तुमच्यावर Reminders ची बरसात होते आणि दंडही वसुल केला जातो. आपल्या व्यवहारात पारदर्शकता (transperancy) या वित्तसंस्थांना आणता येणारच नाही का? किंबहुना ती आलीच तर आपला नफा कसा वाढणार याचे त्यांना भय असावे?


    हा SPREAD काही फुकट वाढवून मिळत नाही त्यासाठी काही फी आकारली जाते. पहिल्यावेळी मी जेंव्हा SPREAD वाढवून घेतला तेंव्हा ती 0.5% of principle outstanding (उर्वरीत मुद्दलावर 0.5% ) असेल असे सांगण्यात आले आणि यापुढे जर अशी SPREAD वाढवून मिळायची योजना आली तर 0.25% of principle outstanding at that time (त्यावेंळच्या उर्वरीत मुद्दलावर 0.25% ) असेल हे तोंडी सांगण्यात आले. नुकताच मी माझा SPREAD तिसऱ्यावेळी वाढवून घेतला. त्यामुळे 'RATE OF INTEREST' कमी झाला. पण फी मात्र 0.5% of principle outstanding (उर्वरीत मुद्दलावर 0.5% ) आकारण्यात आली. चौकशी केली तर कळले कि 'नियम बदलले आहेत' (Rules are changed).


    मला एक कळत नाही यांचे नियम तरी किती? ते बदलतात तरी किती वेळा? आणि सामान्यमाणसाने हे नियम कोठे वाचावेत आणि याचा अर्थतरी कसा लावावा? बरे तुम्ही त्या वित्तसंस्थेच्या करारावर आणि त्यातील अज्ञात-छुप्या नियमांवर सही केलेली असते (Signed on the dotted lines) त्यामुळे तुम्ही अगोदरच त्यांचे बांधिल झालेले असता. कोर्टाची पायरी सामान्य माणुस कायमच टाळण्याचा प्रयत्न करतो. यामुळे या वित्तसंस्थांचे चांगलेच फावते.


    जागतिक वित्तीय संकटावर नुकताच एक छान लेख वाचला. त्यात एक वाक्य होते "यापुढिल काळात तुमच्या वित्तसंपत्तीवर दरोडा पडण्यासाठी तुम्हाला कुठल्याही गुन्हेगाराची किंवा भुरट्या चोराची वाट पाहावी लागणार नाही. तुमचे ज्या वित्तसंस्थेत(Financial Institute) खाते आहे तेच हे काम करेल. गुन्हेगार किंवा चोर तरी पकडता येतो पण ह्या पांढरपेशीयांना कायद्याच्या कचाट्यात पकडताच येणार नाही इतके ते आपले काम सुबकतेने करतील"


    यावर सामान्य माणसाच्या बाजुला काहीच नाही का? कि त्याने "कालाय तस्मै नम:" म्हणतच जगावे ?

    (वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

    Friday, March 12, 2010

    काय भुललासी वरलिया रंगा

    एकदा एका बेडकाच्या पिलाला एक बैल दिसतो. पिलू हि गोष्ट आपल्या आईला सांगतो कि, "मी आज एक फार मोठा प्राणी पाहिला". बेडकाच्या आईला वाटते कि, असा किती मोठा असणार आहे तो प्राणी? ती पोट फुगवून पिलाला विचारते, "किती? एवढा मोठा होता का तो? ". पिलू उत्तरते "नाही. अजून मोठा होता". आई अजून पोट फुगवते आणि विचारते "किती, एवढा का?". पिलू पुन्हा उत्तरते "नाही". असे करता करता बेडुक-आई पोट फुगवत जाते आणि शेवटी पोट फुटुन मरण पावते. गोष्ट काल्पनिक असली तरिही हल्ली घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींचे प्रतिनिधीत्व करते अगदी अर्थेव्यवस्थेत घडणाऱ्या गोष्टींचे सुद्धा !!!


    अमेरिका, दुबई आणि ग्रीस येथे आलेली आर्थिक संकटे काय आहेत आणि त्याचे मुळ कशात आहे? जाणून घेउयात.


    १) अमेरिकेची संपन्न दिवाळखोरी
    अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी लोकांना कर्जे कमी व्याजदरात उपलब्ध करून द्यावे असे 'केन्स' या अर्थतज्ञाने 1929 च्या जागतिक मंदिवरिल (Great Depression)एक उपाय म्हणून सांगितले. यामुळे लोक खर्च करू लागतील त्यामुळे उत्पादनांची मागणी वाढेल मग उत्पादन करण्यासाठी रोजगार निर्मिती होईल मग त्यामुळे लोक खर्च करू लागतील मग पुन्हा मागणी .. असे काहिसे हे गणित होते. उद्योगांना चालना देण्याचे ते एक सुत्र होते.



    अमेरिकेत मध्यांतरी आलेले आर्थिक वादळ म्हणजे 'सब-प्राइम क्रायसिस'(SubPrime Crisis). कुठलेही दिलेले कर्ज जे पत नसतांना दिले गेले आणि परत मिळण्याची शाश्वती नाही त्याला 'सब-प्राइम लोन' असे म्हणतात (जे 'प्राइम' नाही ते 'सबप्राइम') मग ते क्रेडिट कार्ड चे असो किंवा गृहकर्ज (Housing Loan)असो. पण अमेरिकेत घडलेले 'सब-प्राइम क्रायसिस' हे मुख्यतः गृहकर्जाच्या बाबतीत घडले म्हणून त्याला 'सब-प्राइम मॉर्गेज' असेही म्हणतात.

    घरबांधणीच्या उद्योगाला चालना मिळावी म्हणून अमेरिकेत बऱ्याचशा बँका, वित्त-संस्था गृहकर्ज सहज देत. यात कर्जदाराची कर्ज फेडण्याची कुवत आहे कि नाही हे तितक्या गांभीर्याने घेतले जात नव्हते कारण की घरांच्या किंमती वाढतच होत्या. जर कर्जदाराने कर्ज फेडण्यासाठी असमर्थता दर्शवली तर ते घर बँक ताब्यात घेवून जास्ती किंमतीत विकू शकत असे कारण की घरांच्या किंमती चढ्या होत्या. यात मग घराची खरी किंमत किती याची कोणी दखलच घेतली नाही. बऱ्याच बँकांनी मग अश्या कर्जांचा एक गठ्ठा (Portfolio) करून इतर देशातल्या बँका, वित्तीय कंपन्या (Investment bankers,Private Equity players, Venture Capitalists, Hedge Funds etc) यांना चढ्या भावात विकला (अमेरिकेतल्या एखाद्या घराची खरी किंमत ही जपान मधल्या बँकरला कशी कळणार?). याला 'सेक्युरिटायझेशन'(Securitization) असे म्हणतात. थोडक्यात काय तर इतरही देशातल्या बँका, वित्तीय कंपन्या यांना नफ्याची लालुच दाखवून आपल्या पापात सहभागी केले. असे काही काळ चालू राहिले.

    अर्थशास्त्रात एक नियम आहे "एखाद्या वस्तुची खरी किंमत किती हे ती वस्तू जोपर्यंत विकली जात नाही तोपर्यंत कळत नाही."(The real value of an asset is unknown until its traded).  झालेही अगदी तसेच. घरांच्या किंमती एवढ्या वाढल्या कि ती घरे कोणी विकतच घेइनात. 'मागणी घटली कि किंमतही घटते' असा अर्थशास्त्राचा सोपा नियम आहे त्यानुसार घरांच्या किंमती कोसळायला लागल्या. मग ज्या बँकांची/संस्थांची अश्या मालमत्तेत चढ्या भावाने गुंतवणुक (exposure to an asset with inflated value) होती त्यांना पैसे मिळेनात मग त्यांना दिवाळखोरी (bankruptcy) जाहीर करावी लागली. यात 'लेहमन ब्रदर्स', 'मेरिल-लिंच', 'सिटी बँक' अश्या नामांकित संस्थांची नावे आहेत. आता सरकारने अश्या संकटांत सापडलेल्या संस्थांना आर्थिक मदतीचा हात (Financial Stimulus)देउ केला आहे. पण हा सर्व पैसा सामान्य जनतेचा आहे जो गुंतवणुक,कर रुपाने सरकारकडे जमा आहे(Its Tax-Payers money afterall).



    बघा नफ्यात या संस्थांनी कधी सामान्य जनतेला सामावून घेतले नाही पण तोटयात मात्र सामावून घेतले. याला म्हणतात 'नफ्याचे खाजगीकरण आणि तोटयाचे सार्वजणिकरण' (Privatization of Profit and Socialization of Loss). Thats America for you.

    २) दुबईच्या वाळवंटातील वावटळ
    दुबई हे तसे अरब राष्ट्र असले तरिही त्याची अर्थव्यवस्था तेलावर अजिबात अवलंबून नाही. 80 च्या दशकातच दुबईने आपली अर्थव्यवस्था परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केली. उद्योग उभारण्यासाठी अतीजाचक नियम नसल्यामुळे सहाजिकच परदेशी भांडवलदार दुबईकडे आकर्षित झाला. बऱ्याचशा परदेशी कंपन्यांनी आपली कार्यालये दुबईमध्ये स्थापली. यात रोजगार देणारी मुलभुत कारखानदारी किती तयार झाली हा प्रश्नच आहे. पण दुबई मात्र एक उध्योग-केंद्र(Trading hub) म्हणून नावारुपाला आले.



    मग अशा आकर्षित झालेल्या गुंतवणुकदारांना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांना रहायला घरे हवीत ना? म्हणून मग दुबई सरकारचेच अपत्य असलेले 'दुबई वर्ल्ड' आणि 'नाखिल' अशा कंपन्या या घरबांधनीच्या व्यवसायात उतरल्या. सहाजिकच त्यांना पैश्यांची गरज होती ती गरज परदेशी वित्त संस्थांनी कर्जे देवून पुरी केली. यामागे गणित एकच, घरांच्या किंमती वाढतच जाणार आणि आपले पैसे कधीही परत मिळू शकतील. विशेष म्हणजे दुबई सरकारने अशा कुठल्याही कर्जाची परतफेड करण्याची हमी लिहून दिलेली नाही.

    घरांच्या किंमती फुगतच गेल्या आणि मग लोक ती घरे घेईनात. मागणी घटली आणि किंमतीही घटायला लागल्या. 2 वर्षात त्या 50 टक्क्यांनी घसरल्या. सहाजिकच 'दुबई वर्ल्ड' आणि 'नाखिल' यांनी कर्जे फेडण्यास असमर्थता दर्शवली आणि कर्जे फेडण्यासाठी मुदतवाढ मागितली.
    आता या सर्वांना अबुधाबी सरकार मदतीचा हात देते कि हात दाखवते हाच काय तो प्रश्न आहे.

    ३) ग्रीस चे आर्थिक-ऑलिंपिक
    ग्रीसचे आर्थिक संकट थोडे वेगळे आहे पण यामागे कारणीभुत चुकिचे अंदाज हेच आहे. हे समजून घेण्यासाठी आपणाला वित्तिय-तुट(Fiscal Deficit) याची ढोबळव्याख्या समजून घ्यावी लागेल.
    कुठल्याही सरकारला 'कर','गुंतवणुक' रुपाने उत्पन (Income) मिळते आणि सरकार ते लोककल्याणासाठी खर्च (Expenditure) करते. जर उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला वित्तिय वाढ (Fiscal Surplus) असे म्हणतात आणि जर खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर त्याला वित्तिय तुट (Fiscal Deficit) असे म्हणतात. कल्याणकारी सरकारचा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असावा असा एक अलिखित संकेत आहे (Deficit Budgeting). पण मग ही तुट सरकार भरून कशी काढते? तर लोकांकडून पैसे गोळा करून त्यांना त्याबदल्यात बाँड देते किंवा वित्त-संस्थेकडून कर्जे घेते. वित्तिय तुटसुद्धा प्रमाणातच असावी लागते नाहितर गुंतवणुकदार त्या देशाकडे आकर्षित होत नाहित.

    युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळावे म्हणून ग्रीसला आपली वित्तिय तुट(Fiscal Deficit) प्रमाणात दाखवणे भाग होते. मग यासाठी त्यांनी गोल्डमन सॅक्स या अमेरिकन अर्थ-सल्लागार कंपनीची मदत घेतली. या कंपनीने मग ग्रीसला कोटयावधी डॉलरची कर्जे परदेशी वित्त संस्थांकडून मिळवून दिली. यासाठी गोल्डमन सॅक्सने 'फायनांशियल डेरिव्हेटीव्ह' सारख्या क्ल्युप्त्यांचा उपयोग केला. हे 'डेरिव्हेटिव्हसुद्धा' जरा क्लिष्ट प्रकरण आहे पण ढोबळमानाने त्याची व्याख्या अशी करता येईल 'असा करार ज्याची किंमत ही दुसऱ्या वस्तुंच्या किंमतीवरुन काढली जाते ' ( A derivative contract is a financial contract whose value is derived from the values of one or more underlying assets). उदा. एखाद्याने म्हटले की "माझ्याजवळ एक जागा आहे त्याची भविष्यातली किंमत ही अमुक-अमुक होणार आहे या अंदाजावर बोली लावा आणि ज्याला या बोलिवर विश्वास आहे तो ही बोली विकत घेइल". थोडक्यात तो एक सट्टा आहे. बरेचशी मंडळी मग या अंदाजावर सट्टा खेळतात.

    गोल्डमन सॅक्स ने तेच केले. ग्रीस सरकारला कर्ज मिळण्यासाठी काहितरी तारण (Collaterals) ठेवणे भाग होते. ग्रीसने आपल्या महामार्गांवरून पैश्याच्या रुपात भविष्यात मिळणारा 'टोल' (Future cash flow) हेच तारण म्हणून दाखवले. भविष्यात गाड्यांची संख्या वाढ्णार, नविन रस्ते तयार होणार मग आणखी टोल वसुल होणार असे तर्क मांडले असणार. थोडक्यात "भविष्यात मिळणारा टोल अमुक-अमुक असणार आहे ते प्रमाण माणून आम्हाला आज कर्ज द्या" असे सांगितले. बऱ्याचशा वित्त संस्थांनी गोल्डमन सॅक्स ने सांगितलेल्या या भाकडकथेवर विश्वास ठेवला (They bought the story sold by Goldman Sachs) आणि ग्रीस ला कर्ज दिले. पण गेल्या दहा वर्षात हवा तसा टोल जमा झाला नाही, घेतलेले कर्ज फिटले नाही उलट चक्रवाढ पद्धतीने वाढतच गेले आणि ग्रीस आर्थिक संकटात सापडला. एक अफवा अशीही आहे कि कर्ज फेडण्यासाठी ग्रीस आपल्याकडील बेटेसुद्धा विकायच्या विचारात आहे.
    या सर्व प्रकरणांत भले झाले ते 'गोल्डमन सॅक्स' चे. त्यांना भरमसाठ 'कमिशन' मिळाले.



    आहे कि नाही वरिल आर्थिक संकटांत आणि बेडकाच्या कथेत साधर्म्य ? अमेरिका, दुबई, ग्रीस तशी संपन्न राष्ट्रे पण जे चकाकते ते सर्व सोने नसते.

    पण मग असे काही भारतात घडु शकते का?
    मुळत:च भारतीयांचा कल 'कर्ज काढुन दिवाळी साजरी करणे ' याकडे नसतो आणि जोपर्यंत बेडकाची गोष्ट सांगणारे आजी-आजोबा आणि 'अंथरुण पाहुन पाय पसर' असा मौलिक सल्ला देणारे आई-वडिल भारतात आहेत तो पर्यंततरी असे घडण्याची शक्यता नसावी!!!

    (वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)