Thursday, February 18, 2010

ज्युरॅसिक पार्क ते क्वाटर्नरी पार्क

"जरा थांबा, तुम्ही शाकाहारी म्हणवता आणि जे वांग्याचे भरीत खात आहात त्यात एका सजीवाचा जीव जाणिवपुर्वक मिसळला आहे" असे जर कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला काय वाटेल?
होय असेच काहिसे होऊ घातले आहे सध्याच्या काही दिवसांपासुन. आता तुम्ही म्हणाल हे कोडयातले बोलणे सोडा'. खरे असे आहे कि, हा कोडयात पाडण्यासारखाच मुद्दा आहे आणि तो 'उचलली जीभ आणि लावली टाळाला'  असे म्हणुन टाळता येणारासुद्धा नाही.
मागील बरेच दिवसांपासून पेपरामध्ये 'बीटी' वांग्यांबर बंदी घालण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनाच्या बातम्या झळकत आहेत. आपले पर्यावरण मंत्री श्री. जयराम रमेश (IIT-MIT alumnus) त्यामुळे पेचात पडले आहेत.  परंतु हे बीटी वांगे आहे काय आणि त्यालाच एवढा विरोध का यासाठी थोडी वैज्ञानिक पार्श्वभुमी तयार करुयात.

कुठल्याही सजीवाच्या निर्मितीचा मुळ आराख़डा(Blue-Prints) हे त्याच्या DNA मध्ये असतो. असे DNA वेगळेकरून त्यापासून सजींवांची निर्मिती करण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले आहेत. या शास्त्राला जनुकशास्त्र(Genetics) असे नामकरणसुद्धा आहे. बीटी-वांगे हे आहे एक Genetically Modified (GM or Transgenic) वांग्याचे वाण (Seed). बीटी-कृमी (Bacillus Thuringiensis Worm) हा एक शेत-मातीत आढळणारा कृमी आहे. त्यात शेत-पिकाचे किडीपासून संरक्षण करणारा जनुक(Genes) असतो. नेमका हाच जनुक वेगळाकरुन तो मुळ वांग्याच्या वाणात(Seed) मिसळून बीटी-वांग्याचे (सुधारीत?) वाण तयार केले आहे एका परदेशी कंपनीने आणि ते एका भारतीय कंपनीमार्फत भारतात विकावयास आणले आहे. परदेशी कंपनीचा दावा आहे कि, किडे-अळी असे पिकांना उपद्रवी जीव जेंव्हा बीटी-जनुका जवळ जातात तेंव्हा हे जनुक एक विषारी द्रव बाहेर सोडते त्यामुळे किडे-अळी असे जीव पिकांजवळ येत नाहीत आणि पिकांचे आपोआप संरक्षण होते. याउलट काही तज्ञ्यांचा दावा आहे कि, बीटी-जनुकाचा अंश खाणाऱ्याच्या शरीरात गेल्यामुळे त्याच्या शरीरावर प्रतिकुल परिणाम जसे वंधत्व (Infertility), ऍलर्जी, कर्करोग(Cancer) होऊ शकतात.
दावे-प्रतिदावे काहीही असोत पण इथे एक नैतिक(Ethical) प्रश्न असा उठतो कि, 'निसर्गाने निर्मिती केलेल्या अशा वाणात बदल करून आपल्याला पाहिजे ते वाण तयार करण्याचा मानवाला अधिकार आहे काय?'  उदया मानसाच्या जनुकात, प्राण्यांचे जनुक मिसळून तुम्ही एक वेगळीच जमात(Breed) तयार कराल आणि काय माहित पुढे तीच जमात मानसाच्या अस्तित्वावर घाला आणेल? प्रश्न काल्पनिक असला तरीही शक्यतांपासून दुर नाही.

वाघ आणि सिंहाच्या संकरातून (Cross-Breeding) तयार केलेल्या LIGER (Lion + Tiger) चे चित्र खाली पहा.


आता याला काही आधार मिळतो का ते पाहु.  1993 साली 'स्टीवन स्पिलबर्ग' या द्रष्टया दिग्दर्शकाने 'ज्युरॅसिक पार्क' हा अफलातून चित्रपट आणला. त्याचे कथानक थोडक्यात असे आहे कि, जॉन हॅमंड हे 650 लाख वर्षांपुर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेल्या 'डायनॉसॉर' या भयानक प्राण्यांचे DNA मिळवतात.
सापडलेल्या DNA मध्ये बेडकाचे DNA मिसळून आणि जनुकशास्त्र(Genetics) वापरून डायनॉसॉर बनवले जातात. हे डायनॉसॉर ते एका पार्कमध्ये ठेवतात तेच हे 'ज्युरॅसिक पार्क'.हा पार्क त्यांना जगातील सर्वांना बघायला खुला करायचा असतो. या पार्कची शहनिशा करून त्यावर शिक्कामोर्तब(Endorsement) करण्यासाठी ते 3-शास्त्रज्ञ (1-गणितज्ञ, 2-जीवशास्त्रज्ञ) आणि 1-विमातज्ञ्याला पाचारण करतात

पार्कमधील डायनॉसॉरांची संख्या हि गुणसुत्रे (chromosomes) नियंत्रित करून मर्यादित ठेवलेली असते यात पार्कमध्ये फक्त स्रिलींगी (female) डायनॉसॉर असतील याची काळजी घेतली जाते. पार्कला भेट देणाऱ्यांपैकी एक 'डॉ. माल्कम' शंका उपस्थित करतात कि,"उत्क्रांतीवादाने आपल्याला हे शिकवले आहे कि जीवण कधीही बंदिस्त राहू शकत नाही. ते आपला मार्ग सापडून राहते ('Life finds a way')". घडतेही अगदी तसेच. बेडकाचे DNA (amphibian DNA) आपले गुणधर्म बदलतात आणि डायनॉसॉरांचे प्रजनन (breeding) व्हायला लागते. याची कल्पना ज्युरॅसिक पार्क मधील कुनाही शास्त्रज्ञ्याला अगोदर आलेली नसते.


शास्त्रज्ञांच्या पार्क भेटी दरम्यान, पार्कचा विद्युतपुरवठा एक फुटीर-माणुस खंडीत करतो आणि हे 'डायनॉसॉर' मोकळे होउन पार्कमध्ये फिरायला आलेल्या शास्त्रज्ञांच्या मागे लागतात. शास्त्रज्ञ आणि लहान मुले कसाबसा आपला जीव वाचवतात आणि अर्थातच पार्क चालू करू नये या मतापर्यंत शास्त्रज्ञ आणि प्रेक्षक सगळेच येतात ('स्टीवन स्पिलबर्ग'ची खरी कमाल यात आहे.) 

ज्युरॅसिक पार्क मधील विचार करायला लावणारी 4-दृश्ये खालील क्लिप मध्ये आहे. वाचकांना आवाहन कि ही क्लिप जरुर बघावी आणि त्यातील गणितज्ञ डॉ. माल्कम यांची वाक्ये काळजीपुर्वक ऐकावी. त्यांचं वाक्य 'Life finds a way' सगळ्यांवर कडी करून जाते.



कोणीही म्हणेल कि, ज्युरॅसिक पार्क हि एक वैज्ञानिक कल्पना (Science Fiction-SciFi) होती.  म्हणून काय प्रत्येक शोध, संशोधन, प्रकल्प यांकडे असे संशयाने पहायचे काय?
उदा. खालील दाखले हे मानवजातीसाठी उपकारकच ठरले आहेत.
१) लसीकरणामुळे(Immunization) देवी, कॉलरा अशा रोगांचे पृथ्वीतलावरून उच्चाटन झाले आहे.
२) अणु-औषधांमुळे (Nuclear Medicine) कर्करोगावर थोडेतरी नियंत्रण मिळवता आले आहे.
३) विज, फोन, विमान, इंटरनेट अशा शोधांमुळे मानवजात प्रगत (आणि सुखी?) झाली आहे.
४) मुळ पेशी (Stem-cells) मुळे कित्येक अवयव हे कृत्रीमरित्या तयार करता येणार आहेत.
पण कुठलेही शोध, संशोधन, प्रकल्प हे मानवजातीसाठी उपकारक असले तरीही ते निसर्गाशी सुसंगत आहे कि नाही हे प्रमाणित करणारी प्रयोगशाळा (Certifying Laboratory) अजूनतरी पुर्ण अस्तित्वात नाही नाहितर खालील प्रसंग आपणावर ओढावलेच नसते.
१) मुंबईच्या पुरात मिठी-नदी पुन्हा जिवंत झाली, सुनामी मुळे लाखो लोक मृत्यू पावले.
२) समुद्रातील पाण्याची पातळी वाढून काही वर्षांत 'मालदीव' सारखे छोटे देश बुडणार.
३) चीनमध्ये नदीवर बांधलेल्या धरणांमुळे कितीतरी प्रजाती(Species) नष्ट झाल्या आणि आजुबाजुच्या प्रदेशांतील तापमानात वाढ झाली आहे.
४) स्वाइन-फ्लू, बर्ड-फ्लू, चिकनबुनिया सारखे नवीन रोग येत आहेत.
जनुकशास्त्र हे निसर्गाशी सुसंगत कि विसंगत याचे उत्तर कदाचीत आपल्याला पुढची काही शतके मिळुही शकणार नसेल पण एक गोष्ट तितकीच खरी कि ते जर निसर्गाशी विसंगत असेल तर त्याची किंमत आपल्याला नामशेष झालेल्या डायनॉसॉर प्रमाणे चुकवावी लागेल आणि मग मानवानंतर पृथ्वीवर येणारा जीव मानवाला जिवंत करून त्याचे 'क्वाटर्नरी पार्क' ('The present period is called as 'Quaternary Period' according to Geological Timelines.)  बनवेल.


                         (क्वाटर्नरी पार्कचे कल्पनाचित्र)

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

Friday, February 12, 2010

माय नेम इज 'ब्रँड' ... युवर 'ट्रस्ट'

'चितळे बंधू मिठाईवाले आपले पुण्यातील दुकान बंद करण्याच्या विचारात'... काय, बातमी वाचून उडालात ना? मनात विचारांचे काहुर माजले ना? आता आम्हाला स्वादिष्ट बाकरवडी, आंबा बर्फी, मोदक इ. कोण देणार? पाहुण्यांना पुण्याहून नेतांना काय खाऊ न्यायचा? आपल्या परदेशी ग्राहकाला अस्सल पुणेरी पदार्थ काय खाऊ घालायचा? एक ना हजार प्रश्न. But the good news is ' असे काही होण्याची  काहीच शक्यता नाही'. पण समजा चितळेंनी तसा विचार जरी केला तरी लोक त्यांच्या घरावर मोर्चे नेतील, आंदोलन करायला रस्त्यावर उतरतील, सभा घेतील की, 'थोडे जास्ती पैसे घ्या, पाहिजे असल्यास आपल्या शिस्तीचा बाणा (रांग, टोकण, वेळेवर उघडुन-वेळेत बंद इ.इ.) अजून कडक करा (दुपारी वामकुक्षीसाठी बंद ठेवले तरी चालेल).... पण आमच्या जिभेचे चोचले पुरवा'. This is what a BRAND can do to you.


पण का हो असा 'ब्रँड' तयार करण्यासाठी व्यावसायिकाला जाहिराती(Advertisements),गाजा-वाजा(Publicity), सरकारी नियंत्रण(Permit), फुकट सँपलचे वाटप वगैरे वगैरे इत्यादींची मदत घ्यावी लागते का?
जरा इतिहासात डोकावून बघुयात...


१) भारताने मुक्त-आर्थिक धोरण अवलंबण्याच्या अगोदर(Pre-1991) बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये उद्योग उभारण्यासाठी किचकट सरकारी जाचातून जावे लागायचे (License Raj). यामुळे कोणी नवीन उद्योजक पुढे यायचा नाही. त्यामुळे त्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या एखाद्या कंपनीची मनमानी (Monopoly) चाले. उदा. Hindustan Motors या कंपनीने 1991 अगोदर 20 वर्षांत एकही नवीन चारचाकी Model बाजारात आणले नाही(सर्व जुने Ambassador ग्राहकांच्या माथी मारले). Bajaj Scooter नंबर लागल्यावर प्रत्यक्ष हाती यायला 5-6 वर्षे लागत. दुरध्वनीसंच (Telephone) मिळायलासुद्धा असेच 5-6 वर्षे लागत. पण यांना 'ब्रँड' म्हणता येइल? हि तर लादणुक झाली. म्हणजे असे सुद्धा लादलेले 'ब्रँड' असायचे तर...


२) 1991 मध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था थोडी नाविलाजाने का होइना खुली केली आणि भराभर परदेशी कंपन्या आपले दुकान भारतात मांडू लागल्या. भक्ष गिळलेल्या अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या भारतीय कंपन्यांना अचानक खडबडून जागे व्हावे लागले. काहींनी संघटीत होउन सरकारी संरक्षण मागितले (Bombay Club), काहींनी या आव्हानाला सामोरे जायचे ठरवले, काहींनी आपले धंदे बंद केले तर काहींनी आपला धंदा चक्क परदेशी कंपन्यांना विकला. पारले(Parle) ही शितपेयातली (Cold Drinks)नावाजलेली कंपनी. तिने आपले सर्व शितपेयातली ब्रँड (Thums-up, GoldSpot etc) कोका-कोला (Coca-Cola) या परदेशी कंपनीला विकले. Coke या आपल्या ब्रँडला स्पर्धा नको म्हणून कोका-कोलाने पारलेचे 'ब्रँड' मारायचे ठरवले पण Thums-up हा 'ब्रँड' ते काही मारू शकले नाही कारण त्याला असलेली लोकप्रियता! Its the only BRAND in the world which Coke couldnt kill after takeover. आहे कि नाही 'ब्रँड' ची गंमत?


३) बरेचसे 'ब्रँड' मर्यादित काळापर्यंत चालतात पुढे स्पर्धेमुळे त्यांचा टिकाव लागत नाही. अशांना संधीसाधू म्हणता येईल. उदा. DEC-Machines, Fiat etc.


४) वरिल उदाहरणे वस्तू (Products) संदर्भातील आहेत. आता तुम्ही म्हणाल सेवा (Services) क्षेत्रातील ब्रँडचे काय? सेवा क्षेत्रात प्रामुख्याने येणारे उद्योग म्हणजे हवाई-वाहतुक(Airlines) ,माहिती तंत्रज्ञान(IT-Services), पर्यटन(Tourism) वगैरे. सेवा क्षेत्रात सुद्धा ब्रँड असतो पण तो प्रामुख्याने जी व्यक्ती ती सेवा देते आणि जी व्यक्ती ती सेवा घेते या दोघांमधील अद्रुश्य बंधांवर अवलंबून असते. सेवा देणाऱ्याने सेवा दिली पण ती घेणाऱ्याला कशी वाटली यावरच त्याचे ब्रँड-मुल्य ठरते (How the rendered service is perceived, decides the Brand-Value). कसे ते सोदाहरण पाहु.
सिंगापुर एअरलाइन्स त्यांच्या उड्डानादरम्यान(In-Flight) दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल प्रसिद्ध आहे. एकदा सिंगापुर-मुंबई विमानप्रवासा दरम्यान बाजुला एक भारतीय जोडपे आपल्या तान्हुल्या बाळाला घेउन बसले होते. सिंगापुरहून प्रवास सुरू झाला आणि काही वेळाने ते छोटे बाळ रडायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या उपायांनीसुद्धा त्याचे रडणे काही थांबेना. आजुबाजुचे प्रवासी त्याकडे पाहू लागले. त्या जोडप्यालासुद्धा थोडे बुजल्यासारखे झाले. पण करणार काय? छोटे बाळच ते! त्या जोडप्याची ती अवस्था पाहून सिंगापुर एअरलाइन्सची एक तरुण हवाईसुंदरी जवळ आली आणि आपल्या जराशा तोकड्या आंग्ल भाषेत संवाद साधत बाळाला खेळवू का अशी परवानगी मागू लागली. आईने थोडे हायसे वाटून बाळाला हवाईसुंदरीजवळ दिले. ती बाळाला घेवून आपल्या कक्षाकडे गेली. काही वेळाने बाळ आणि हवाईसुंदरी अगदी हसत हसत आले आणि हवाईसुंदरीने बाळाला बरीचशी खेळनी आणली होती. मला खात्री आहे की ते जोडपे आणि बाकी इतर प्रवासीसुद्धा हवाईसुंदरीच्या या प्रेमळ व्यवहाराने सुखावले असणार आणि अगदी बाळाची सुद्धा अशी काळजी करणाऱ्या सिंगापुर एअरलाइन्सला पसंती देणार. झाले सिंगापुर एअरलाइन्सचे ब्रँडिंग झाले. You dont have to create BRAND, it gets created.



५) अमिताभ हा एक असाच ब्रँड (Yes, a person is also a BRAND). 'कुलीच्या' सेटवर झालेल्या अपघाताने म्रुत्युशय्येवर होता. पण लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या, नवस केले, होम-हवन केले आणि त्याला पुन्हा आपल्यात आणले.




आता मला एक सांगा, नामशेष झालेल्या किंवा बाजारातील पत कमी झालेल्या किती 'ब्रँड' नि लोकांचा विश्वास (खरोखरचा) संपादन केलेला असतो आणि तरिही त्यांना बाजारात पत राखायला अपयश आलेले असते?


जर बारकाइने बघितले तर नामशेष झालेल्या 'ब्रँड' नि लोकांचा पाहिजे तितका विश्वास कधीच संपादन केलेला नसतो. तो 'ब्रँड' केवळ एक संधी म्हणून चालत असतो (Opportunistic). जर लोकांचा पाहिजे तितका विश्वास त्यांनी संपादन केलेला असेल तर लोकच तो 'ब्रँड' मरू देणार नाहीत. फार लांब जायला नको 'चितळे', 'Thums-up','सिंगापुर एअरलाइन्स','अमिताभ' ही उदाहरणे बोलकी आहेत. यासाठी एक गुण मात्र त्या व्यावसायिकामध्ये असावा लागतो तो म्हणजे लोकांची 'नस' ओळखण्याचा, ती पकडून ठेवण्याचा, त्यांना त्यांच्या पैशाचा योग्य तो मोबदला आणि समाधान देण्याचा. मग तुम्हाला जाहिराती(Advertisements), सरकारी नियंत्रण(Permit), गाजा-वाजा(Publicity), फुकट सँपल यांच्या कुबड्या घ्याव्या लागत नाहीत.


मॅनेजमेंट-गुरू Stephen Covey हेच त्याच्या 'The SPEED of Trust' या पुस्तकात सांगतो.




एकदा का तुमच्या हाती लोकांची नस आली कि मग तुमच्या काळजाचे ठोके ते कधीच चुकू देणार नाहीत.

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

Monday, January 18, 2010

पैसा झाला मोठा...पाऊस आला खोटा

एक यशस्वी व्यावसायिक(दुकानदार) मृत्युशय्येवर असतांना आजुबाजुला सर्व नातेवाइक जमा होतात. व्यावसायिक विचारतो "मारो छोटो बेटो किथ्थे?" (माझा लहान मुलगा कुठॆ आहॆ?), सगळ्यात लहान मुलगा म्हणतॊ "बाजु मा" (बाजुलाच आहॆ). व्यावसायिक विचारतो "मारो बडॊ बेटो किथ्थे?" (माझा मॊठा मुलगा कुठॆ आहॆ?),सगळ्यात मॊठा मुलगा म्हणतॊ "बाजु मा" (बाजुलाच आहॆ). व्यावसायिक थॊडा वैतागतॊ आणि पुन्हा विचारतो "मारो मजलॊ बेटो किथ्थे?" (माझा मधला मुलगा कुठॆ आहॆ?),मधला मुलगा म्हणतॊ "बाजु मा" (बाजुलाच आहॆ). आता व्यावसायिक पुरता संतापतॊ आणि ऒरडतॊ "अरॆ, तॊ दुकानपर कुण हॆ?" (तुम्ही सर्व इथे आहात तर दुकानावर कॊण आहॆ?).


यातला विनॊदी भाग सोडला तर चुटक्यात बरेच तथ्य आहे. व्यावसायिक मग तॊ छॊटा किराणा दुकानदार असॊ वा टाटा-बिर्ला सारखा धनाढ्य, 'निव्वळ नफेखोरी' हेच एक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवुन धंदा करतात.


एकदा TQM (Total Quality Management) या विषयावरिल परीसंवादात भाग घेण्याचा योग आला. यात एका नामांकित Business Group च्या वेगवेगळ्या व्यवसायाचॆ CEOs उपस्थित हॊतॆ. परिसंवादातील मुख्य वक्त्याने प्रश्न केला "आपण कुठल्या व्यवसायात आहॊत?" (We are in which Business?). 'किती फालतु प्रश्न' असे भाव चेह्ऱ्यावर आणत वेगवेगळ्या CEOs नी वेगवेगळी उत्तरे दिली उदा. स्थावर मालमत्ता (Real Estate), माहिती-तंत्रज्ञान (Information Technology) वगैरॆ. वक्ता म्हणाला "साफ चुक". सगळॆ CEOs हबकलॆच. आश्चर्यानॆ एकमेकांकडे बघु लागले. वक्ता उत्तरला "Remember the basic truth, We are in the Business of making PROFITS" (आपण 'नफा-कमावण्याच्या' व्यवसायात आहॊत). उद्या कुठल्यातरी नविन धंद्यात १००% नफा आहे हे त्यांना कळु द्या, यांचॆ दुकान लगॆच तयार (उदा.- महाराष्ट्र शासनानॆ धान्यापासुन दारु तयार करणाऱ्या २६ नविन उद्यॊगांना परवानगी दिली आहे.त्यातुन हजारॊ कोटी रुपयांचा महसुल आणि नफा हा शासन आणि राजकारणी-व्यावसायिकांना मिळणार आहे आणि ही दारु देशातच विकली जाणार आहे.).


Nike हि कंपनी त्यांच्या shoes साठी जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या नफ्याचे (खरे) प्रमाण आहे ५००%. त्यांच्या पटावर(On Office role) फक्त ४२ कर्मचारी आहेत. Shoes design सॊडुन बाकिची सर्व कामे Nike गरिब दॆशांतुन(Third world counties) करुन घॆतॆ. त्यांच्या या छ्ळ-छावणी मध्ये (Sweat-Shop) बालमजुर तॆ व्रुद्ध, दिवसाला 3-डॉलर पेक्षाही कमी पैशात राबत असतात. Its a classical case of Corporate-Cruelty.


आता कुणीही म्हणेल की, व्यवसायाचे उद्दिष्ट नफा नाहितर दानधर्म असावे काय? आणि त्याने नफा मिळवला नाही तर खाणार काय? आता याची उत्तरे खाली मिळतात का तॆ पाहु!


नुकताच 'Economic Times' नॆ आयॊजित कॆलॆल्या समारंभात 'आमिरखान' ला वक्ता म्हणुन बॊलावण्यात आलॆ (कारण अर्थातच त्याच्या 'थ्री इडियटस' या चित्रपटाचॆ व्यावसायिक यश आणि यातुन भारतातील व्यावसायिकांना (Corporate World) काही संदेश मिळतो का हा असावा). समारंभात बिर्ला साहॆबांनी प्रश्न केला "एक वेगळी संकल्पना घेउन चित्रपट निर्माण करतांना त्याला व्यावसायिक यश मिळेल याची खात्री होती का?" (पहा व्यावसायिकाची मानसिकता...चित्रपटाचा आशय सोडुन केवळ नफ्याचा विचार). आमिर म्हणाला "नाही. तसा विचार तसुभरही शिवला नाही. चित्रपटाचा आशय आवडला आणि काम करायचॆ ठरवलॆ." आपल्या Speaker's KeyNote मध्यॆ आमिर म्हणाला "आपल्यात बालपणापासुन स्पर्धॆचॆ बाळकडु पाजलॆ जातॆ. याचा परिणाम म्हणजॆ आत्मकॆंद्रित समाज तयार हॊतॊ जॊ कॆवळ स्वार्थाचा विचार करतॊ. आपल्या मुलाला शाळेतुन आल्यानंतर स्पर्धेचे गुण विचारण्याऐवजी, आज किती लोकांना मदत केली ते विचारा...पहा एका वेगळ्या समाजाची निर्मिती होते कि नाही." आमिर त्याच्या नॆहमीच्या 'जरा हटके' पणाला जागला.





'बॊर्डरुम' या अच्युत गॊडबॊलॆ लिखित पुस्तकात त्यांनी अगदी रास्त प्रश्न उपस्थित केलाय "जिवघेणी स्पर्धा करणाऱ्या आणि निव्वळ नफा हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवणाऱ्या मोठ-मोठ्या कंपन्यांमुळे समाजाचे खरोखरच भले होते का?" प्रश्न अनुत्तरित असला तरी बरेच काही सांगुन जातो.






Stay Hungry Stay Foolish या पुस्तकातील CEO म्हणतो "व्यवसायाची उद्दिष्टे ठरवतांना उच्च-कल्याणकारी ध्येय्य असावे. नफा आपल्याकडे चालत येइल" (A Business should have BIGGER-PURPOSE, Profit will fall in place). पण नफा आपल्याकडॆ चालत येइपर्यंत वाट पहायला इथे कोण तयार आहॆ?


उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन म्हणाला हॊता "जॆ जुळवुन घॆतात तॆच तग धरतात" (It is not the strongest species that survive, nor the most intelligent, but the ones most responsive to change).


डायनॉसॉर नंतर पृथ्वीवर राज्य करणाऱ्या आपल्या मानवजातीला तगुन रहाण्यासाठी एकमेकांबरोबर जुळवुन घ्यायला नाही का जमणार ?

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

Monday, January 11, 2010

अज्ञानात सुख असतं

रस्त्यावर कचरा गॊळा करणाऱ्या एका गावंढळ जोडप्यात कडाक्याचॆ भांडण झालॆ. नवऱ्यानॆ बायकॊला यथेच्य चोप दिला आणि निघुन गेला तिने त्याला आरडाओरड करुन शिव्या दिल्या. ती जरा वेळ रडली आणि पुन्हा कामाला लागली. थोड्या वेळाने तो पुन्हा आला आणि काय आश्चर्य तॆ दॊघॆ पुन्हा एकत्र कामाला लागले आणि सोबत घरी गेलेसुद्धा. मुक्तपिठ मध्ये हि गोष्ट काहीदिवसापुर्वी आली. विचार कॆला कि, ह्याचजागी जर एखादे शहरी-शिकलेले जोडपे असते तर ? कदाचीत त्यांच्यामध्ये "You are encroaching my personal space, You are humiliating me, I deserve self-respect, Where is my self-identity" असा काहिसा संवाद झाला असता कदाचित काडिमोड पर्यंत गोष्ट गेली असती. शिव्या दॆणॆ हा आपला प्रतिकार असॆ त्या गावंढळ स्रीला आणि मार दॆणॆ हा आपला अधिकार असॆ त्या गावंढळ पुरुषाला वाटत असावॆ. किंबहुना आयुष्य असॆच असतॆ हॆ त्यांनी स्विकारलॆलॆ असावॆ. कायदा काय म्हणतॊ, तॊ कुणाच्या बाजुला आहॆ, मानवी हक्क(Human-Rights), नैसर्गिक न्याय-हक्क असे काही असते हॆ त्यांना माहितही नसावे. या अज्ञानामुळॆतर त्यांचॆ वैवाहिक जीवन चालले नसावे ना?


असॆ म्हटलॆ जातॆ कि 'अज्ञानात सुख असतं' (Ignorance is BLISS). कधीकधी जास्त खॊल विचार न करता घेतलेले निर्णयच योग्य ठरतात. जितकॆ विचार खॊल तितकी ध्येयशक्ती क्षीण. 'गहरी सोच इरादोंको कमजोर बना देती है'. याचा प्रत्ययसुद्धा आपणास यॆतच असतॊ. उदा. एखाद्याला 'अर्थविषयक' गुंतवणुकीत गती असेल तर स्वत:चे अर्थविषयक निर्णय घेतांना तो हजारवेळा विचार करेल. माझी गुंतवणुक कुठल्या 'Financial Instrument' मध्ये जास्त सुरक्षित असेल. मला परतावा(Returns) जास्त आणि धोका कमी असणारे पर्याय काय? या Scrip चॆ Fundamental & Technical Analysis काय सांगतॆ? या कंपनीचा CashFlow कसा आहॆ, OrderBook कसॆ आहॆ? आता Stock Market पडणार तर नाही ना? मी फसवला तर जाणार नाही ना? वगैरॆ वगैरॆ... जितकॆ जास्त Parameters तितका जास्त गॊंधळ आणि निर्णय घ्यायला तितकाच उशीर.


आपला नोकरीदाता(Employer) आपल्यावर १००% Margin ठॆवुन आपल्याला पिळत असतॊ हॆ आपणास माहित नसतॆ आणि त्यातच आपण आपली रोजी रोटी कमवत असतो.


'मालगुडी-डेज'या मालिकेत एकदा एका सामान्य पण सुखी माणसाला एक 'अंतरंगात डोकावणारा' चश्मा मिळतो. हौसेखातर तो चश्मा घालुन आपल्या नजिकच्या लोकांत जातॊ आणि यांच्या अंतरंगात डोकावतो. दुखावतो कि तोंडावर गोड बोलणारी मंडळी त्याच्या 'मरणावर' टपुन बसली आहेत. तॊ चश्मा नदित फॆकुन दॆतॊ आणि म्हणतॊ कि, हा चश्मा नव्हता तेंव्हा मी खरोखरच यापेक्षा जास्त सुख़ी होतो.


उद्यमशिलता(Enterpreneurship) तपासतांना काही साहसवित्तवाले(Venture Capitalists) हॆच बघतात कि, एखाद्या गोष्टीत अपयश येइल हे तुम्हाला कितपत माहित नाही?(They look for your Risk-Apetite). जितके तुम्ही अननुभवी तितके चांगले कारण कि यात अपयश यॆतॆ हॆ तुम्हाला माहित नसते आणि तुम्ही ती गोष्ट यशस्वी करुनही टाकता (Its better to have no experience than gathering large irrelevant experience).


वसतीगृहात रहात असतांना एक सदा नापास होणारे व्यक्तिमत्व होते. तो म्हणायचा 'More Information...More Confusion, Less Information...Less Confusion and No Information...No Confusion'.


खरोखरच 'अज्ञानात जग जगतं'. म्हणुनच परमेश्वराने जन्माला घालतांना आपल्याला आपल्या मागच्या अनॆक जन्मांविषयी 'अज्ञात' ठॆवलं असावं.

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

Saturday, January 09, 2010

'वॆल् सॆट्ल्ड' - तॆ काय् रॆ भाउ?

पु.लं. नी त्यांच्या 'मुंबइकर-पुणॆकर-नागपुरकर' यात् पुणॆकर हॊण्याचे एक महत्वाचॆ लक्षण सांगितलॆ आहॆ तॆ म्हणजॆ 'कुठल्याही गॊष्टींवर मत मांडायला शिका'. नुकतीच पुण्यात 'मुलगा वॆल् सॆट्ल्डच हवा' या विषयावर 'अनुरुप विवाह' संस्थॆतर्फॆ खुली चर्चा बॊलावण्यात आली. या चर्चासत्राचा मुख्य् श्रोतृवर्ग हा अर्थातच विवाहोत्सुक तरुण तरुणी होता. खरेतर या विषयाची चर्चा आयोजित करण्यामागचॆ प्रयोजन हॆ मध्यांतरी 'शॆतकरी मुलगा नकॊ ग् बाइ' या तरुण् शॆतकरी मुलांना भॆडसावणाऱ्या विवाह-समस्या हॆ असावॆ. जुळवुन् (Arranged) कॆलॆल्या लग्नामध्यॆ बरॆचसॆ पालक् 'मुलगा हा वॆल् सॆट्ल्डच हवा' चा आग्रह धरतात. आता अशा खुल्या विषयांवर मत प्रदर्शन् करणार नाही तर् तॆ पुणॆकर कुठलॆ? याला अर्थातच् व्रुत्तपत्रांमध्यॆ प्रसिद्धी मिळाली.




'वॆल् सॆट्ल्ड' ची व्याख्यासुद्धा माणसागणिक वॆगवॆगळी असतॆ. कुणाला 'भरपुर पैसा', कुणाला 'नॊकरी-गाडी-बंगला', कुणाला कायमची (म्हणजॆ सरकारी) नॊकरी, कुणाला भरभराटीचा धंदा म्हणजॆ 'वॆल् सॆट्ल्ड' वाटतॆ. चर्चासत्राच्या मुख्य पाहुण्यांनी एक मुद्दा उपस्थित् कॆला तॊ म्हणजॆ 'वॆल् सॆट्ल्ड हि संकल्पना अशाश्वत गोष्टींवर आधारित आहे अशा अशाश्वत् गॊष्टींची शाश्वती कशी काय असु शकते?'. मुद्दा खरॊखरच् विचार् करायला लावणारा आहॆ.


पैसा, प्रसिद्धी, नॊकरी (सरकारी सॊडुन्), नातॆवाइक (दुरचॆ), मित्र (अपवाद् वगळता) जॆ आपण् सगळं जिवनावश्यक मानतॊ... सगळंच् तर् अशाश्वत् असतं. अमिताभ् बच्चन चॆ उदाहरण् वाणगी दाखल देता येइल. या महानायकाकडॆ त्याच्या पडतीच्या काळात जवळच्या कितीतरी लोकांनी पाठ फिरवली. सामान्य माणसालासुद्धा हॆ अनुभव थॊड्याफार फरकानॆ येत असतातच.
उदा.
१) गरज संपताच इतक्यादिवस गॊडी गुलाबीने वागणारा वरिष्ठ (Boss) ओळख दाखविणासा हॊतॊ.
२) अती प्रसिद्धीनेसुद्धा अती विरोधक तयार् हॊतात.
३) अती पैसा अती नातेवाइकांना जवळ आणतो.
पण प्रश्न असा आहॆ कि, पैसा-प्रसिद्धी-नॊकरी-सामाजिक स्थान हॆ सर्व् आपल्या समाजात मुल्य-मापनाचॆ एकक(Units) आहेत. त्यांना डावलुन आपणाला एक समाधानी आयुष्य जगता येइल? आपण आपल्या सुखाच्या सर्व कल्पना वरील अशाश्वत गोष्टींवरुन ठरवतो. ज्याने वरील सर्व गोष्टींचा फोलपणा जानला तो संतपदाला पोहोचला. माणसाची विचार करण्याची शक्ती, संकटांमधुन वाट काढण्याची क्षमता, सर्वांना मदत करण्याचा स्वभाव हेच त्याच्या मुल्यमापनाचे मापदंड असावेत असेही मत चर्चासत्रात मांडले गेले.
आणखी एक विचार म्हणजे समजा वरिल सर्व गोष्टीं एखाद्याला फार तरुणपणीच मिळाल्या तर त्याला आयुष्यात पुढे वाटचाल करायला काय प्रयोजन मागे राहिल? राजकुमार सिद्धार्थ(नंतरचे भगवान बुद्ध) नाही का मग सर्व सुखे पायाशी लोळण घेत असतांना संन्यासी झाले?
एकाठिकाणी वाचल्याचे स्मरते -There are only two problems in life. One 'Not to get what you desire' and other ' To get them'.


जितके जीवन अपुर्ण, तितके जगण्याचे प्रयोजन जास्त. 'गोडी अपुर्णतेची लावील वेड जिवा' आणि 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हेच खरे !!!

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

Wednesday, January 06, 2010

तीन वेडे



'थ्री इडियटस' हा 'चेतन भगत' यांच्या 'फाइव्ह पॉइंट समवन' या कादंबरीवर आधारीत चित्रपट सध्या जोरदार गर्दी खेचतो आहे.
खरेतर चित्रपटाचा संदेश सोपा आहे तो म्हणजे ' काबिलीयत बनाओ, कामयाबी अपने आप मिल जायेगी'. पालक आपल्या अपेक्षा मुलांवर लादतात आणि मुले या जगाच्या अनिर्बंध स्पर्धेत आपोआप खेचली जातात. मग त्यांना आपली नेमकी आवड, आपला कल, आपले छंद सगळेच विसरून 'ऐहिक' (materialistic) सुखाच्या शोधात सगळे आयुष्य खर्च करावे लागते. मी कोण (self identity) हे कित्तेकांना शेवट पर्यंत कळत नाही. मग वाटते 'ये जिनाभी कोइ जिना है लल्लु? '. पण प्रश्न असा पडतो कि, आपल्यापैकी किती जनांना आपल्या मनाचा कल कुठे आहे हे बरोबर समजते? समजा तो कल समजायला वयाची पन्नाशी आली तर 'आवडीचे' काहितरी करायला कोण धजावेल? त्यापुढे बरेचजण मग 'ठेविले अनंते तैसेची राहावे' म्हणून पुढची वाटचाल करतात.


कोणीतरी बरोबर म्हटले आहे ''convert your hobby into profession and you never have to work'. वॉलस्ट्रीट जर्नलला मुलाखात देतांना 'बिल गेटस'ला विचारण्यात आले की, 'एवढे मोठे साम्राज्य निर्माण करायचे तुझे स्वप्न अगोदर पासून होते काय? '. त्याचे उत्तरही तितकेच मार्मिक होते. तो म्हणाला 'नाही. मी फक्त तेच केले जे मला स्वतःला वापरायला आवडेल. ' आपली आवड एखाद्या मोठ्या धंद्याचे रुप घेइल हे त्याच्या गावीही नसावे. नामांकित हार्वर्ड विद्यापिठाला त्याने रामराम ठोकला यातच सर्व आले. स्टिव जॉब्ज (CEO of Apple) सुद्धा याच पठडितला. त्याचा 'Stay Hungry Stay Foolish' हा स्टॅनफर्ड विद्यापिठाच्या पदविदान समारंभात दिलेला संदेश खरोखरच संग्राह्य आहे.




आपल्या भारतात मात्र असे 'साहसी' प्रकार करणारे प्रमाणाने कमी आहेत. मेडिकल रिसर्चच्या एका निरिक्षणानुसार भारतीयांमध्ये हृ्दयविकाराची शक्यता ही पाश्चिमात्यांच्या तुलनेत तिप्पट जास्त असते. 'साहसी' क्रिडा प्रकारांमध्येसुद्धा भारतीय तुलनेने कमी असतात. मला वाटते याला कारणीभुत 'सामाजीक' जडणघडण आणि वैयक्तिक मानसिकता असावी. जर एखादा मनुष्य नोकरीवरून 'बेकार' झाला किंवा त्याला धंद्यात 'नादारी' पत्करावी लागली तर समाज किंवा सरकारतर्फे त्याला कुठलीही मदत मिळत नाही. पाश्चिमात्य देशांत ते तितकेच सहजतेने घेतले जाते (Its taken sportingly). मध्यांतरी रश्मी बंसल या लेखिकेने IIM-Ahemedabad मधून उत्तिर्ण झालेल्या आणि स्वतःच्या हिंमतीवर आयुष्यात वेगळी वाट चोखंदळणाऱ्या २५ लोकांवरती एक पुस्तक लिहिले. त्याचे शिर्षक आहे 'Stay Hungry Stay Foolish'. हे पुस्तकही तितकेच वाचणीय आहे.



तद्दन मसालेपटासाठी बदनाम असणाऱ्या 'बॉलिवुड' कडून एका विचार करायला लावणाऱ्या कलाकृतीची ('थ्री इडियटस') निर्मिती झाली हे ही नसे थोडके.

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

Monday, January 04, 2010

पळा पळा कोण पुढे पळे तो...

गौरी डबीर यांनी धनंजयची विदारक सत्य कथा  मुक्तपीठ मध्ये   सांगितली  आणि IT मधील ताण हा विषय पुन्हा चर्चेत आला. खरेतर 'ज्याच जळत त्यालाच कळतं' त्यामुळे बरेचसे IT मॅनेजर याकडे एक Incidence म्हणून सोडून देतील तसेच काहींना याची gravity सुद्धा कळणार नाही कारण काही मॅनेजर्सनी अशी परिस्थिती कधीही अनुभवलेली नसते किंवा अशी परिस्थिती आपल्यावर कधीच येणार नाही अशी त्यांची धारणा असते. परंतु धनंजयच्या घरची आणि मित्रांची जी अपरिमीत हानी झाली आहे ती शब्दांतून सांगताच येणार नाही. गौरी यांनी जी कळकळीची विनंती केली आहे ती खरोखरचं समजू शकतो पण वास्तव तितकेसे सोपे नसते.
१) IT मध्ये 'थांबला तो संपला' हेच ब्रिद आहे. अगदी ३ महिन्यात काहीतरी नविनच technology तुमच्या हातात दिली जाते आणि तुम्हाला अगदी कमी कालावधीत तो प्रोजेक्ट उभा करायचा असतो. आता यामध्ये कोणी कितीही realistic परिस्थिती सांगितली (प्रोजेक्ट वेळेत संपणार नाही आणि नवीन technology शिकायला वेळ लागेल),तरी वरच्या मॅनेजमेंट मध्ये कुणालाही त्या realistic गोष्टी ऐकायच्या नसतात (No one wants to hear the bad news). प्रत्येक IT कंपनीची अपेक्षा असते ती म्हणजे राक्षसी नफा कमीत कमी वेळेत मिळवणे. तो नफा कायमच प्रोजेक्टवर काम करणाऱ्या लोकांची पिळवणुक करुन मिळवला जातो. हे capitalistic (भांडवलशाही) अर्थव्यवस्थेचे सत्य आहे.
२) यात एखाद्याने धाडस करून सत्य वरच्या मॅनेजमेंटच्या घशी उतरवण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला  Negative,Incompetent,Non-Flexible असे शेरे मारून प्रवाहातून दुर फेकले जाते.
३) एखाद्याने धाडसी पाउल उचलून नोकरी सोडली तर त्याला दुसऱ्या ITनोकरीमध्येसुद्धा ह्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही याची काय खात्री ? (Its better to work with known DEVIL than unknown one )
४) एखाद्याने काही काळ विसावून नंतर नव्या दमाने यावे असा विचार केला तर त्याच्या विसाव्याच्या काळात technology इतकी बदललेली असते की त्याला नंतरच्या IT नोकरीत सगळेच नव्याने शिकावे लागते आणि त्याच्या स्पर्धेत नवतरुण असतात ज्यांची जास्त काळ थांबण्याची तयारी असते कारण त्यांच्यावर सांसारीक जबाबदारी अजून पडलेली नसते.
५) नोकरी सोडणे हे आपल्या भारतीय समाजव्यवस्थेत तरी अजुनही संशयाने बघीतले जाते (Its a social stigma). यात त्या नोकरी सोडलेल्या माणसाचे नको इतके मानसिक खच्चीकरण होते आणि कधी-कधी त्याचा आत्मविश्वास नको इतका खालावतो. (career-break is unheard of in India).
६) बरे नोकरी सोडून नवीन काय करायचे हा एक गहन प्रश्न आहेच. वाढलेल्या वयात नवीन गोष्टी कमीत कमी वेळेत आत्मसात करून त्यात यश मिळवणे हे आहे ती नोकरी टिकवण्या इतकेच महत कार्य आहे (Its equally herculian task).
७) IT मध्ये सुद्धा काही कंपन्यांमध्ये काही customer-account मध्ये कामाचे स्वरुप इतके मोकळे-ढाकळे असते कि काही आजोबा-काका मंडळी त्या customer-account मध्ये असंख्य दिवस काढतात. पण असा सुखाचा 'कोपरा' मिळायला तुम्ही तितकेच नशिबवान असावयाला हवे आणि अशा mediocre work culture मध्ये दिवस काढायची तुमची मानसिकता हवी.
८) खरेतर आत्ताची तरुण पिढी एका फार मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे.(open economy, global market, ruthless competition, hire and fire work culture etc etc). इतर देशसुद्धा अशा स्थित्यंतरातून गेले आहेत पण यासाठी त्यांची पुर्ण पिढीच खर्ची पडली आहे. जपान हे उदाहरण अगदी अलिकडले आहे. यात किती कामगारांवर अन्याय झाला कितींची कुटुंबे अस्ताव्यस्त झाली याची खरी माहीती कुठल्याही सरकारी ठिकाणी मिळणे दुरापास्त आहे पण सत्य असे आहे की विकास (?) हा कशाच्यातरी मोबदल्याच मिळत असतो (Its always at the cost of something). आता याला खरा विकास म्हणायचे का हा एक चर्चेचा दुसराच मुद्दा आहे. आणि सरकार त्यासाठी वेगळे कामगार-संरक्षक कायदे बनवणार नाही.
शेवटी नाविलाजाने सांगायला लागते कि, गौरी यांच्या मतांशी मनातून अगदी १००% सहमत असून प्रश्न पडतो ' खरोखरीच आपल्या मनासारखे जगणे जगता येइल? खरोखरीच असे विसावता येइल?'

Friday, May 19, 2006

गुगल (इ)स्टोरी

जगातले बरेचशे शोध हे 'अपघाताने' लागले आहेत. गुगलही याला तितकेसे अपवाद नाहिये.
खरेतर एक PHD साठी घेतलेला विषय एका मोठ्या व्यवसायचे रुप घेइल हे लॅरी आणि सर्गी (दोघेही गुगलेचे संस्थापक आहेत) यांना स्वप्नात सुद्धा वाटले नसेल.
गुगल जेंव्हा बाजारात आले तेंव्हा अल्टाव्हीस्टा, एक्साइट, याहु हि मंडळी अगोदरच या व्यवसायात होती. गुगल ने वेगळे काय केले असेल तर ते PageRank Algorithm वापरुन, इंटरनेट्वरील शोध (search) ला वेगळे रुप दिले. PageRank मुळे जास्त relevant search results च, आपणास दिसतात. यात लॅरी पेजची संशोधक व्रूत्ती दिसुन येते.
हा प्रोजेक्ट या मंडळींनी नंतर अल्टाव्हीस्टा, एक्साइट, याहु यांना विकण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला परंतु भविष्य काही वेगळेच घडणारे होते.
हि मंडळी जेंव्हा सावकाऱांकडे (Venture Capitalists) पैसे मागायला गेली तेंव्हा बरेच ठिकाणी निराशाही झाली. ज्या सावकाराने पहिल्यांदा त्यांना पैसे दिले ते हे बघुन कि या मंडळींना MotherBoard, Drives घेण्यासाठी पैसे वापरायचे आहेत, advertiseसाठी नाही. ( कधी कधी तुमचे प्रामाणिक उत्तर काय काय करु शकते त्याचेच हे उदाहरण. त्या सावकाराने $१,००,००० ची मदत त्यांना दिली.)
पुढे गुगलची यशोगाथा सर्वश्रुत आहेच.
गुगलवर अजुन सविस्तर माहिती क्रमशः

Thursday, September 09, 2004

कहानी लंडनच्या आजीबाईंची

आजीबाई बनारसे ,लंडन ' एवढ्या त्रोटक पत्यावर पत्र पोहोचेल असे वाटते का ? नाहि ना ? पण काही व्यक्ति आपल्या कर्तुत्वाचा झेंडा अगदी लंडनपार लावतात. आजीबाई बनारसे त्यातील एक.
विदर्भातील 'चौंडी ' या खेडेगावात आजीबाईंचा जन्म झाला. लहानपणीच आई , वडिल वारले. पहिले लग्न झाले. ५ मुली झाल्या. यजमान वारले. प्रापंचीक गरज म्हणुन दुसरे लग्न केले आणि काहिशा अपघातानेच त्या लंडनला पोहोचल्या.
लंडनमध्ये दुसर्‍या यजमानांचे लवकरच निधन झाले. आजीबाई अक्षरश: रस्त्यावर आल्या परंतु नियतीच्या मनात काहि औरच होते.
परिस्थितिचे चटके खात-खात त्या तेथिल विख्यात 'लॅन्ड लेडि' बनल्या. भरभराटीच्या काळात त्यांच्या नावावर लंडनमध्ये १४ इमारती होत्या. लंडनमधील हिंदू साई मंदिर , महाराष्ट्र मंड्ळ हे आजीबाईंची देन आहे.
एवढे कर्तुत्व गाजवणार्‍या आजी 'निरक्षर' होत्या यावर कुणाचा विश्वासहि बसणार नाही.
त्यांच्या जिवनावर 'कहानी लंडनच्या आजीबाईंची' हे पुस्तक 'राजहंस प्रकाशन' ने प्रकाशित केले आहे. ते फ़ारच वाचनिय आहे.
आजींची संक्षिप्त कहानी खालील संकेतस्थळावर आहे.
http://tulipsintwilght.wordpress.com/2007/08/10/aajibai-banarse/

(माझ्या या ब्लॉग-पोस्टला बऱ्याच भेटी होतांना दिसत आहेत. आपणास अजुनही बरेच काही वाचनीय माझ्या मनमोकळं या ब्लॉगवर सापडु शकेल.)

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)